सारांश : आर्थिक फसवणूक होत आहे...सावधान!

सारांश : आर्थिक फसवणूक होत आहे...सावधान!

पैसे कमावणे अवघड आहे, पण घालविणे फार सोपे आहे...! असे आज मला का म्हणायचे आहे, ते समजून घ्यायला हवे. 

अलीकडच्या काळात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चाललेल्या दिसत आहेत. रोजच्या वृत्तपत्रात अशा बातम्या वाचनात येत आहेत. पुन्हा-पुन्हा लोक फसत आहेत. खूप जास्त व्याज मिळते म्हणून पैसे गुंतवणे किंवा व्याजाने देणे, शेअर्स किंवा तत्सम गुंतवणूकपर्यायात अवाजवी परताव्याचे आमिष दाखवून भुलवणे यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत.

सोने स्वस्तात देतो, दागिन्यांना पॉलिश करून देतो, खजिना सापडला आहे तो तुम्हाला देतो, खूप व्याज देतो, तुमच्या जुन्या विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, इन्कम टॅक्‍स रिफंड मिळवून देतो, तुम्ही लकी ठरले आहात, मोठे गिफ्ट मिळणार आहे, स्वस्तात डॉलर देतो, असे अनेक फसवणुकींचे प्रकार पाहायला मिळत आहेत. पण अशा ठिकाणी दिलेले पैसे परत मिळतील काय, याचा विचारच केला जात नाही. जास्त व्याजाच्या मोहाने व्याज देखील जाते आणि मुद्दल देखील गायब होते. भुरळ घालणारा, फसवणारा, हा कायम खूप घाई करत असतो. खूप मोठे आमिष दाखवतो व "चांगली संधी' निघून जाईल, अशी भीती दाखवतो. तसेच अनेक ओळखीच्या लोकांची नावे सांगतो. त्यामुळे सर्वसामान्यांना भुरळ पडते. 

पैसे कमावताना अनेक गोष्टी लागतात. मेहनत, दूरदृष्टी, बुद्धी, अनेक वर्षे कष्ट लागतात. पण त्याउलट पैसे घालविणे सोपे आहे. ते झटपट व डोके न चालविल्यामुळेच, विचार न केल्यामुळे सहज होते. क्षणिक लोभ, भुरळ, मती न वापरल्यामुळे पैसे जातात व परत मिळतच नाहीत, असा अनुभव नंतर येतो. मग फक्त मनस्ताप आणि पश्‍चात्ताप. नंतर प्रश्‍न पडतात - "मी थोडा विचार केला असता तर?, मी नाही म्हणू शकलो असतो तर?, मी कोणाचा तरी सल्ला घेतला असता तर? 
ठक आणि लोभी एकत्र आले तरच फसवणूक होते, असे म्हणतात. बाजारात ठक पावलोपावली आहेत, परंतु आपण लोभी असल्याशिवाय फसवणूक होत नाही.

जेवढा वेळ आपण पैसे कमावण्यासाठी घालवतो, त्यापेक्षा थोडा सुद्धा वेळ आपण पैसे गुंतवताना करीत नाही- कारण केवळ एकच आणि ते म्हणजे म्हणजे लोभ व घाई. व्यापाऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, गिऱ्हाईक जाईल या भीतीने अवाजवी दिलेली उधारी आपले पैसे बुडवून जाते. पुढचा माल दिला तर पहिले पैसे मिळतील, असे मानले तर अधिकच पैसे अडकतात. आलिशान गाड्या, ऑफिस पाहून अनेकांना हमखास भुरळ पडते. झटपट श्रीमंत करू पाहणाऱ्या गोष्टींपासून धोका आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. 

हल्ली तर सायबर गुन्हे खूप वाढत चालले आहेत. फोनवर तुमचे पासवर्ड घेऊन पैसे काढून घेणे, तुमचा ई-मेल हॅक करून तुमच्या गिऱ्हाइकांकडून पैसे घेणे, फेसबुकवरून खोटी माहिती देऊन लुटणे, लुबाडणे, लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणे, असे अनेक फसवणुकीचे प्रकार होत आहेत व रोज वाढत आहेत. यापुढेही वाढत राहणार आहेत. आपण सतर्क राहण्याची गरज आहे. कोणी काहीही सांगितले तरी थोडा विचार करा, वेळ घ्या, चौकशी करा, कागदपत्रे पाहा. अनोळखी फोन, एसएमएस, व्हॉट्‌सऍप, ई-मेलला उत्तरे देऊ नका. जास्त व्याजाला व अर्ध्या रात्रीत श्रीमंत व्हायच्या स्वप्नाला बळी पडू नका. 

जगात कोणीही, कोणालाही काहीही फुकट देत नसतो. पैसे मिळाले तर किती अधिक मिळतील यापेक्षा "गेले तर काय,' याचा विचार आधी करा. क्षणिक मोहाला बळी पडू नका, कारण आपले पैसे हे मेहनतीचे आणि कष्टाचे आहेत, हे लक्षात ठेवा आणि सावधगिरी बाळगा.

फसवणारा आपल्यावर एवढा मेहेरबान का, हा साधा प्रश्‍न आपल्याला का पडत नाही? गुंतवणूक आणि विमा क्षेत्रातील योग्य, जाणकार व्यक्तीची मदत घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल टाकू नये. तसे न करता उचललेले पाऊल भविष्यात नुकसानकारक ठरते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com