अर्थभान : मोहजाल ‘आयपीओं’चे!

चालू वर्ष हे नि:संशय प्राधमिक समभागविक्रीचे म्हणजेच ‘आयपीओं’चे आहे, यात शंका नाही
अर्थभान : मोहजाल  ‘आयपीओं’चे!
अर्थभान : मोहजाल ‘आयपीओं’चे!sakal media

चालू वर्ष हे नि:संशय प्राधमिक समभागविक्रीचे म्हणजेच ‘आयपीओं’चे आहे, यात शंका नाही. जानेवारीपासून आजपर्यंत ५३ नव्या कंपन्या आपले शेअर विक्रीसाठी घेऊन आल्या. त्यातील ७० टक्के आजही चांगला नफा दाखवत आहेत. मग साहजिकच प्रश्न पडतो, की काय वाईट आहे नव्या पब्लिक इश्युसाठी अर्ज करण्यात? चला, यानिमित्ताने समजून घेऊया.

  • पहिला चुकीचा सल्ला : प्रत्येकच नव्या इश्यूला अर्ज करा. त्यात आपल्याला शेअर लागले, की नोंदणी (लिस्टिंग) झाल्यावर विकून टाका; नाहीतरी ७० टक्के नफ्यात असतातच. काही तोट्यात असतील (३० टक्के), तरी त्याकडे लक्ष न देता, जसे लागतील तसे विकून टाका, नफा होईलच! पण येथेच खरी मेख आहे.

  • एक तर, शेअरसाठी मागणी भरमसाठ होत असल्यामुळे आपल्याला ‘अॅलॉटमेंट’ची लॉटरी लागण्याची खात्री नाही. जे शेअर ‘लिस्टिंग’च्या वेळेस मोठा नफा देतील असा अंदाज असतो, ते सहसा आपल्याला मिळतच नाहीत आणि नेमके जे मिळतात, ते तोट्यात ‘लिस्ट’ होण्याची शक्यता जास्त दिसून येते. तेव्हा वर दाखवलेले नफ्याचे प्रमाण ७:३ दिसत असले तरी प्रत्यक्षात मोठी भिस्त नशिबावर ठेवावी लागते.

  • तिसरा प्रश्न म्हणजे चुकून शेअर मिळालेच तरी त्यांचा भाव शेअर बाजारात कसा हालेल, याची कोणतीच हमी नाही. ‘लिस्टिंग’नंतर जो भाव मिळेल, तो आपला म्हणून विकावे, तर त्या शेअरच्या कधी अंगात येईल आणि तो वर जाईल, ते कळत नाही. काही उदाहरणे देतो. ‘लक्ष्मी ऑर्गेनिक’चा १३० रुपयांना दिलेला शेअर, १६४ रुपयांवर नोंदला गेला आणि पुढील तीन महिने २०० ते २२० रुपयांच्या दरम्यान घुटमळत होता. अचानक एक जुलै रोजी तो वाढायला लागला २३० चा २४०-२५०-२७० होत खाली यायचे नाव घेत नव्हता. पुढे नऊ ऑगस्ट रोजी तिमाही निकाल जाहीर झाले आणि कंपनीचा नफा चौपट झाल्याचे बाजाराला कळले. त्यादिवशी २९९ अन् पुढे महिनाभरात या शेअरचा भाव ६०० रुपये झाला. आता तिमाही निकाल ‘कोणाला तरी’ आधीच कळले होते का, ते समजायला मार्ग नाही. पण ज्या गुंतवणूकदाराने विकले, त्याला आपली चूक झाल्याची भावना होतेच! तीच गत इतर अनेक नव्या शेअरची.

  • शेअर बाजारात जसजशी तेजी वाढत जाईल, तसतसे नव्या शेअरचे अमाप पीक येणार व प्रत्येक इश्यू चढ्या भावातच येणार, हे समजून असावे. दोन-चार मोठे इश्यू पडल्यावरच ही झुंड मागे फिरेल आणि पुन्हा वाजवी भावात नवे शेअर मिळू लागतील. त्यावेळी मात्र नक्की अर्ज करावेत.

  • सहसा चांगले मानांकन व शिफारस असलेला शेअर नशिबाने मिळालाच, तर किमान एक तिमाही निकाल हातात मिळेपर्यंत सांभाळावा. निकाल अपेक्षेपेक्षा चांगला असल्यास भाव वाढेलच. हा सर्व नफा अल्पकालीन आहे, असे धरून योग्य तो संयम ठेऊन विकावा.

  • ज्या क्षेत्रातील नवे इश्यू येत आहेत, ते क्षेत्र सध्या शेअर बाजारात तेजीत आहे, की मंदीत, ते बघूनच अर्ज करायचे ठरवावे.

  • सर्वसामान्य छोटा गुंतवणूकदार आयपीओचे ‘प्रॉस्पेक्टस’ वाचत नाही. ‘ग्रे मार्केट’च्या प्रीमियमवरच अर्ज करायचा की नाही, हे ठरवतो. हा प्रीमियम अत्यंत क्षणभंगुर असतो, हे त्याला कळते; पण वळत नाही. तरीही संदर्भ म्हणून या माहितीचा उपयोग होऊ शकतो.

  • कर्ज काढून नव्या शेअरसाठी अर्ज नक्कीच करू नये.

  • नव्याची नवलाई ओसरायला वर्ष-दीड वर्ष लागते आणि मग शेअर बाजार भानावर यायला लागतो. २०१९ मध्ये स्टर्लिंग-विल्सन सोलारचे शेअर ७८६ रुपयांना देऊ केले होते. आजचा भाव आहे ४०१ रुपये! स्पंदना स्फूर्तीचा ८५६ रुपयांना देऊ केलेला शेअर १३३५ रुपयांच्या आसपास ‘लिस्ट’ झाला होता, पण आता ४२४ रुपयांवर आहे. ही नवलाई ओसरली, की नीट अभ्यास करून शेअर घेता येतात.

  • भारतीय शेअर बाजारात नसलेल्या क्षेत्रातील व त्याचवेळी अमेरिकी बाजारातील यशस्वी पूर्वेतिहास असलेल्या क्षेत्रातील नवा इश्यू आल्यास, त्या शेअरचा नक्कीच पाठपुरावा करावा. उदा. नजारा टेक, नायका. नव्याची नवलाई ओसरल्यावर खालच्या भावपातळीला घेण्यायोग्य असे हे क्षेत्र आहे. तेव्हा आता तुम्हीच ठरवा, शेअर केव्हा घ्यावा ते!

(लेखक भांडवली बाजाराचे जाणकार आणि ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com