स्पर्श : 'माणूस महत्त्वाचा की गुरे?'

स्पर्श : 'माणूस महत्त्वाचा की गुरे?'
स्पर्श : 'माणूस महत्त्वाचा की गुरे?'

डोंगरकपारीत जंगलाच्या जवळ एक वाडी होती. त्या वाडीमध्ये त्यांचा मोठा वाडा होता. त्यांचं घराणं प्रतिष्ठित होतं. जंगलाच्या अलिकडे त्यांची 100 एकरपेक्षा जास्त जमीन होती. वाड्यात नोकरचाकर होते. दूध, तूप, लोण्यांसाठी आणि शेतकामासाठी गायी, बैल, म्हशी, गुरे होती. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र नोकरमाणूस नेमलेला होता. घरात एक ज्येष्ठ गृहस्थ होते. या साऱ्या संपत्तीचे ते जणू काही सम्राट होते. त्यामुळे सारे त्यांना मालक म्हणून हाक मारत. त्याशिवाय मालकांचे तीन मुले आणि त्यांचे नातवंडे वगैरेंनी वाडा नटलेला होता. पहाटे साडेचारपासून वाडा जागा व्हायचा. रात्री अकरापर्यंत वाड्यात हालचाल सुरूच राहायची. मालक तसा व्यवहारी पण अत्यंत मृदु, नम्र आणि प्रेमळ होता. त्यामुळेच वाड्यातील अनेक नोकरमाणसे अनेक वर्षांपासून इमानइतबारे काम करत होती. मालकाकडे संपत्ती आणि समृद्धी तर होतीच. पण त्याशिवाय त्याच्याकडे माणुसकीही होती.

एकदा नेहमीप्रमाणे नेहमीचा माणूस गायी-गुरांना डोंगरकड्यावर चरायला घेऊन गेला. इकडे वाड्यात इतर नेहमीची कामे सुरूच होती. साधारण अर्ध्याच तासात तो धावत धावत आला. त्याला खूप घाम आला होता. तो प्रचंड भेदरलेला दिसत होता. अशाच अवस्थेत तो वाड्याच्या दाराशी येऊन धडकला. तो फक्त जोरजोरात ओरडत होता. "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ', अशा हाका मारत तो मालकांच्या खोलीकडे जाऊ लागला. वाड्यातील सगळे नोकरचाकर "काय झालं? काय झालं?' म्हणत त्याच्या मागे धावू लागले. पण तो प्रचंड भेदरलेला होता. त्यामुळे तो कोणालाच दाद देत नव्हता. त्यामुळे वाड्याच्या मुख्य दारापासून मालकाच्या खोलीपर्यंत येताना गोंधळ निर्माण झाला. नेहमीप्रमाणे काम करणारा वाडा अचानक गोंधळून गेला. हे सारे वातावरण पाहून आत हिशोब मांडून बसलेला मालक त्याच्या खोलीच्या दाराशी आले. तेवढ्यात तो तिथे पोचला. आणि पुन्हा "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ', अशा हाका मारू लागल्या. "अरे, शांत हो! काय झालं काय नीट सांग?', मालकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो फक्त "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ' एवढेच म्हणू लागला. मग काही वेळाने कोणीतरी मागून ओरडले, "मालक गुराजवळ वाघ आला वाटतं!' तेवढ्यात त्यानेही "होऽऽ होऽऽ वाघ वाघऽऽऽ' असे म्हणत समर्थन केले. त्यावर वाड्यात काम करणारा एक ज्येष्ठ माणूस जोरात धावत पुढे आला आणि "साल्या, जनावरांना, गुरा-ढोरांना तिथं टाकून इकड आलास होय र?', असे म्हणत त्याने ओरडणाऱ्या माणसाच्या कानाखाली जोरदार चपराक दिली. तेवढ्यात मालकांनी त्या कानाखाली मारणाऱ्या माणसाला खडसावले, "अरे, येडा आहेस की काय? त्यो एकटा. त्यो वाघ रानटी जनावर. कसा काय लढणार ह्यो त्या जनावरासोबत. आणि समजा एखाद्या गुरावर वाघाने हल्ला केलाच तर काय होईल? पर ह्यो माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा नाही का? तूच सांग मला शेवटी माणूस महत्त्वाचा की गुरे?'

मालकांचे शब्द ऐकून काही वेळापूर्वी गोंधळून गेलेला वाडा पुन्हा निशब्द झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com