Loksabha 2019 : गुजरातमध्ये भाजपचे प्राबल्य तरीही काँग्रेस वाढणार

bjp, congress
bjp, congress

भूमीपूत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी घातलेली भावनिक हाक, तर "विकास पागल हो गया है,' या घोषणेनंतर विकासासाठी "न्याय' योजना राबविण्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेले आश्‍वासन यांवर गुजरातमधील सर्व 26 जागांवर मंगळवारी (ता. 23) मतदान होत आहे. गुजरातमध्ये भाजपचे प्राबल्य असले, तरी काँग्रेस किमान चार-पाच जागा जिंकेल, अशी स्थिती आहे. 

मोदी यांनी काँग्रेसचा जोर वाढल्याची चिन्हे दिसत असलेल्या भागात आठ प्रचार सभा घेतल्या. "देशात माझे सरकार पुन्हा येणार आहे. पण, गुजरातने 26 जागा दिल्या नाहीत, तर निकालाच्या दिवशी त्याचीच चर्चा होईल. म्हणून भूमीपुत्राची काळजी घ्या, अन्‌ भाजपला सर्व 36 जागा द्या,'' असे भावनिक आवाहन करीत मोदी यांनी पाटन येथे प्रचाराची सांगता केली. 

"विकास पागल हो गया है,' या राहूल गांधी यांच्या घोषणेने दीड वर्षांपूर्वी गुजरातेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे गुजरात तीन वर्षांपूर्वी हादरला होता. गांधी यांच्यासोबत पाटीदार समाजाच्या आंदोलनाचे नेते हार्दीक पटेल, ओबीसीचे नेते अल्पेश ठाकोर, दलित समुदायाचे नेते जिग्नेश मेवानी या तरूण नेत्यांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे आव्हान उभारले होते. गांधी यांनी अनेक दौरे केले. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडत त्यांनी गुजरातेत झालेल्या विकासालाच आव्हान दिले होते. "विकास पागल हो गया है,' या त्यांच्या घोषणेला लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. 

केडर बेस असलेल्या भाजपचे कार्यकर्त्यांचे जाळे गावपातळीपर्यंत घट्ट विणलेले आहे. त्या रचनेला आधार घेत, तसेच मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभा घेत, पाण्यावर विमान उतरवित प्रचारातील वेगळपणा दाखवून देत विधानसभेला निसटता विजय मिळवून दिला. मोदी यांच्या प्रचाराने काठावरील जागा भाजपच्या पारड्यात पडल्या. 182 सदस्यांच्या विधानसभेत भाजपला 99 जागा, तर काँग्रेसला 77 व त्याचा मित्रपक्षांना चार जागा मिळाल्या. 

त्या निवडणुकीत भाजपला एक कोटी 47 लाख मतदारांनी (49.1 टक्के), तर काँग्रेसला सुमारे सव्वा कोटी (41.4 टक्के) मतदारांनी मते दिली. 2012 मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे मतदान एक टक्‍क्‍याने, तर काँग्रेसचे मतदान अडीच टक्‍क्‍याने वाढले. 

लोकसभेच्या 2009 मधील निवडणुकीत भाजपने 46.5 टक्के मते मिळवित 15 जागा, तर काँग्रेसने 43.4 टक्के मते मिळवित 11 जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये मोदी लाटेत झालेल्या निवडणुकीत साठ टक्के मते मिळवित भाजपने सर्व 26 जागा जिंकल्या. त्यावेळी काँग्रेसला 43.4 टक्के मतदान झाले होते. 

मतदानाच्या या टक्केवारीवरून 1995 पासून राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची राजकीय स्थिती लक्षात येते. मोदी यांनी सलग तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर, देशाचे पंतप्रधान झाले. आपल्या राज्यातील नेता देशाचा पंतप्रधान आहे, या मतदारांमधील भावनेचा फायदा मतदानाच्या वेळी भाजपला निश्‍चित होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपेक्षा त्यांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल. मात्र, सौराष्ट्र, तसेच दक्षिण गुजरातेत, आदिवासी भागात काँग्रेसचे आमदार आहेत. सौराष्ट्र-कच्छ भागातील 54 पैकी 30 जागी काँग्रेस निवडून आले. यांसह लोकसभेच्या अन्य सात-आठ जागांवर काँग्रेस चांगली लढत देत आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पाच-सहा आमदारांना फोडण्यात भाजपला यश आले. अल्पेश ठाकोर यांनी नुकतेच काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र त्यांना निवडणूक लढविता आली नाही. ते प्रचारात असताना त्यांच्यावर एका कार्यकर्त्याने भर सभेत हल्ला केला. गांधी यांनीही जुनागड, भूज, महुआ, बार्डोली या चार ठिकाणी सभा घेतल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

भाजपला त्यांच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणावयाच्या आहेत. गुजरातेतील सर्व जागा त्यांच्याच ताब्यात असल्याने, त्या टिकवून ठेवणे हेच त्यांच्यापुढचे आव्हान आहे. त्या उलट भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या राज्यातून काही जागा जिंकण्यावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी लक्ष केंद्रीत केलेल्या सात-आठ जागांपैकी किमान चार-पाच जागा तरी त्यांनी निश्‍चित मिळतील, अशी सध्याची स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com