घुमघुमणारी सिंहगर्जना..

sigh1
sigh1

कोल्हापूरात.. डोळ्यात धगधगती आग घेऊन.. दृढ विश्वासाने गर्जना केलीय सिंहाने... 

मनात राग आहे.. चौथाळलेपण आहे.. तीक्ष्ण नजर धरून आहे..  भिनभिनलंय.. नैराश्य आहे.. थोडी भीती आहे.. चलबिचलता आहे.. काळजी आहे.. जाणीव आहे.. तीव्र भावना आहे.. सकारात्मक आहे.. निसर्ग हैराण आहे म्हणून चिडचिड आहे.. चुकीचं दिसतंय पण सहकार्याची आशा आहे, म्हणून शांत आहे !
होय स्वार्थ आहे.. कारण जीवावर बेतलंय....

भिजलोय.. गाराठलोय.. पण त्याच थाटात आणि रुबाबात चालतोय.. पाय लडबडत नाहीयेत.. घर शोधतोय.. सापडलं तर ठीक, नाहीतर पुन्हा नव्याने..

हरवलोय पण शुद्धीत आहे.. भ्रष्ट नाही झालेलो.. वाट शोधत आहे.. सोबत आहेत बरेचजण...
जीवा-भावाचे आहेत माझे या कोल्हापुरात.. सारखाच स्वभाव आहे सर्वांचा..नडीला पडतात.. प्रेम करतात.. शिव्याही घालतात पण साथ नाहीत सोडत माझे हे कोल्हापूरकर.. नुसती हलकीशी गर्जना करायचा अवकाश.. पण माझ्या विलक्षण गर्जनेनं अवकाशच फाटलं...

आवाज बुलंद आहे... त्यात मायेचा सूर आहे.. ज्याला ऐकू आला तो आला धावून... एरवी न बोलणारे हात देऊ लागलेत.. हृदय ओलसर झालंय सगळ्यांचं त्यानिमित्तानं..... 
बोलता बोलता.. शब्दांचा स्फोट होऊ नये, म्हणूनच मर्यादेत आहे !

पुराचे पाणी ओसरतय.. भिजलेली लाल-काळी-तपकिरी माती रस्त्याच्या कडेला जाणार.. हळू हळू रहदारी वाढणार.. पण बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागणार.. स्वच्छतेची काळजी घ्यावी लागणार.. आणि बऱ्याच गोष्टी...

कोल्हापूर....
इथं कोणी ऐरागैरा नाही.. संकट आलं तरी स्वतःच्या हिमतीनं आणि दोस्तांच्या साथीनं उभारणारा लढवय्या आहे...

रक्तात उर्मी.. गुर्मी....
शब्दात तडाखा आहे...
पूर आला तरी सावरतो आहे..
थोडा हादरलोय पण नैसर्गिक आपत्तीला मान देऊन..

मदतीचा हात देणारे झगमगाटीचा लेप लावायलेत.. पण असुदे.. तेही माझेच आहेत.. कारण ते माझ्यासाठीच आलेत.. मदत करता करता थोडे लालित्य दाखवतायत.. पण त्यांना माफ आहे.. कारण भांडायला वेळ नाहीये.....

गेले काही दिवस पाणीच पाणी होतं.. अजूनही आहे.. आज कोल्हापूरसारख्या सदन शहरांमध्ये अशी पूरस्थिती तयार होत असेल तर, विचार न करावा तो बरा.... कारणं अनेक !

अनेकजण गावाबाहेर अडकले आहेत.. त्यांना गावची ओढ आहे.. इकडं परत यायचं आहे.. कोल्हापूर सावरायचंय.. पण वाटच दिसत नाहीये. कुठं गायब झाली कोल्हापूरची ही वाट कुनाठाऊक... परवा तर दिसत होती. रस्ता दिसू लागला की तेही येतीलच त्यामुळं भ्यायचं कारणच काय नाही....

घालमेल होती आहे ती याचीच की, कोणाचे कोण राहिलंय शिल्लक काळजी घ्यायला, की जायचं पुढं.....
हलक्या बुद्धिनं विचार करायला भाग पडतंय सारं..... 
या सगळ्यात संकटात साथ कशी द्यायची आणि का द्यायची हे तरी समजलं या चांगल्या लोकास्नी..

पुढं काय... तर, 
पुन्हा उभं राहायचं.. घडायचं.. लढायचं.... शांत चालत चालत काही अंतरावर जाऊन बुलंद गर्जना फोडायची.... मागेही वळून बघायचं.. पण भीतीनं नाही, तर आपलं कोण मागे राहिलंय का ते बघायचं, आणि त्याला घेऊनच पुढं जायचं.. 

या नैसर्गिक आपत्तीत कष्ट सहन झालेले.. कष्ट सहन केलेले... जीव वाचलेले.. सुखरूप घरी परतलेले.. सर्वजण आत्मविश्वासाने.. माणुसकी राखत कोल्हापूर नव्याने ताकदीने उभारणार... 

कृतज्ञता..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com