आरोग्याची कामधेनू!

श्रीमत्‌ आद्य शंकराचार्य यांनी एका स्तोत्राची सुरुवात अशी केलेली आहे. सर्वांना आकर्षित करणारी अशी ज्याची शक्‍ती आहे, तो श्रीकृष्ण. म्हणजे साहजिकच परमेश्वर
आरोग्याची कामधेनू!
आरोग्याची कामधेनू!

गाईला आपण ‘गोमाता’ म्हणतो, पण सर्वसामान्यपणे गाय व माय हे शब्द जोडीने वापरले जातात. जन्म देते ती ‘माय’ व नंतर सर्व इंद्रियांचा विकास करून मुलाला वाढवते ती ‘गाय’! गाईची उपमा मनुष्याच्या इंद्रियस्वभावांना दिलेली असते. गाय जशी दिवसभर इकडे तिकडे भटकते, त्याप्रमाणेच इंद्रिये स्वतःच्या विषयाचे सेवन करण्यासाठी दिवसभर बाहेर भटकतात व धडपडतात. इंद्रियांच्या या जन्मजात प्रवृत्तीचा अभ्यास करून त्याचे तत्त्व जो समजून घेतो, तो गोविंद-गोपाल! संपूर्ण सृष्टीला हवे ते देणारी व मनुष्यमात्राचे संवर्धन व कल्याण करणारी अशी जी गाय समुद्रमंथनातून बाहेर आली, तिचे नाव कामधेनू.

श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।

श्रीमत्‌ आद्य शंकराचार्य यांनी एका स्तोत्राची सुरुवात अशी केलेली आहे. सर्वांना आकर्षित करणारी अशी ज्याची शक्‍ती आहे, तो श्रीकृष्ण. म्हणजे साहजिकच परमेश्वर. श्रीकृष्ण या नावानंतर लगेच गोविन्द अशा नावाचा उल्लेख केला. गो म्हणजे गाय, हे आपणा सर्वांना माहीत आहे आणि गो या शब्दाला विद्‌ म्हणजे जाणून घेणे या धातूपासून बनलेला शब्द लावून गोविन्द हा शब्द बनला आहे. ‘गो’धनाचे संपूर्ण ज्ञान ज्याला झाले आहे, तो गोविन्द-श्रीकृष्ण आणि गाईंचे पालन-पोषण करणारा तो गोपाल!

श्रीकृष्णांचे बालपण अत्यंत यशस्वी होते. बालपणापासूनच त्यांनी लोककल्याणाचे काम केले, ऐन उमेदीत गृहस्थाश्रमाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पेलली, एक यशस्वी राजा म्हणून त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे व उदंड लोकप्रियता मिळवून राज्य केले, घराघरावर सोन्याची कौले चढविली, दुष्टांचा संहार करून सज्जनांना तारण्याचे कार्य केले, नात्या-गोत्याच्या मोहमायेच्या गुंतावळ्यात न अडकता वाईट शक्‍तींचा नाश हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. अशा प्रकारे श्रीकृष्णांचे संपूर्ण आयुष्य कशामुळे यशस्वी झाले असेल, तर ते गोविन्द या गुणवत्तेमुळे. श्रीकृष्णांनी गाईचा व गो-सेवेचा महिमा ओळखला व शेतीप्रधान देशाला मदत करणाऱ्या पशुधनाचे माहात्म्य ओळखले, तसेच निसर्ग पर्यावरणाची काळजी घ्यायची असल्यास पशुधनातील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या गाईचे महत्त्व समजून घेणे खूप गरजेचे आहे, हेही ओळखले आणि म्हणूनच सगळ्या बाजूंनी ते विजयी झाले. केवळ पैशाच्या लोभापायी किंवा दुसरा कोणताही व्यवसाय करणे शक्‍य नसल्यास दूध-दुभत्याचा व्यवसाय करणे वेगळे आणि समजून घेऊन व्यक्‍तीचे व समष्टीचे कल्याण या व्यवसायाने होईल अशा विचाराने त्यात लक्ष घालणे वेगळे. श्रीकृष्ण या ठिकाणी गाईचे महत्त्व ओळखून ते लोकांना पटविण्याचा प्रयत्न करतात.

महत्त्व गाईच्या दुधाचे...

गाय दिवसभर फिरते, ती कधीच एका ठिकाणी बसत नाही, गाय उन्हा-तान्हात, अरण्यात फिरते, गवत खाते व तिचा आहार कमीच असतो. म्हशीच्या तुलनेत गाईने दूध कमी दिले तरी तिच्या आहाराच्या तुलनेत गाय दूध जास्त देते. गाईच्या दुधाचा उपयोग सर्वमान्य आहेच. गाईचे दूध पचायला सोपे असते. अगदी जन्मजात मुलाला आईचे दूध मिळू शकले नाही तर त्याच्यासाठी गाईच्या दुधाची योजना केली जाते, एवढे ते पचायला सोपे असते. गाईच्या दुधाचा हृदय व मेंदू या महत्त्वाच्या अवयवांना जास्त उपयोग होतो म्हणून मेंदूसंबंधी, डोळ्यासंबंधी असणाऱ्या औषधांमध्ये गाईच्या दुधाचा व गाईच्या तुपाचा वापर केलेला असतो. अर्थात, म्हशीचे दूध पचायला थोडे जड असले तरी त्याचेही फायदे आहेतच. म्हशीचे दूध घ्यायचे झाल्यास ते गाईच्या दुधापेक्षा थोडे कमी घ्यावे, हे सर्वांना माहीत आहेच.

गाईचे दूध, साय, दही, लोणी, तूप या सर्व गोष्टींचा भरपूर वापर केला, तर मुळात रोगच येणार नाहीत व आले तरी बरे करणे सोपे होईल. ही मेख लक्षात घेऊन श्रीकृष्णांनी स्वतःच्या प्रत्येक अस्तित्वाबरोबर गाय जोडली गेलेली असेल, अशी योजना केली. गाईच्या बऱ्याच जाती असतात. गीरच्या जंगलातील गीर गाय, तिला आपण श्री दत्तांची गाय म्हणू, ही खूपच प्रसिद्ध जात आहे. सर्वोपयोगी गाईचे महत्त्व वाढविण्यासाठी महादेवांनी आपले वाहन म्हणून नंदीला स्थान दिले. अनेक वर्षे भारतीय संस्कृतीत गाईला मिळालेले प्रसिद्धीचे स्थान उगाचच मिळालेले नसणार. गाईचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे बाळाला बाहेरचे अन्न या स्वरूपात दूधच सर्वप्रथम दिले जाते. नंतर मनुष्य जसजसा मोठा होईल व मेहनत करायला लागेल तसतसे जड पदार्थही त्याला पचवता येऊ लागतील. परंतु तान्ह्या बाळासाठी पचायला हलका असल्याने गाईच्या दुधाला किंवा एकूणच दुधाला पर्याय नाही व त्यामुळेच गाईचे महत्त्व आहे. दूध सेवन केल्यानंतर साधारण २४ तासांत पचते व त्याचे वीर्यधातूत रूपांतरण इतर वस्तूंच्या तुलनेने लवकर होते. त्यामुळेही गाईचे महत्त्व वाढलेले आहे. गाईला मानाचे स्थान देण्याच्या दृष्टीने आपल्या भारतीय परंपरेत दिवाळीच्या दिवसात गोवत्स द्वादशीला स-वत्स गाय (लहान वासरासहित असलेली गाय) पूजिली जाते, त्यानंतर पुढच्या दिवसात धनाची वा लक्ष्मीची पूजा केली जाते.

आरोग्यशेती आणि आरोग्य

‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ असे म्हटलेले आहे, म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राला अन्नाची गरज असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने व अनुभवावर आधारित शेती केल्यासच मनुष्याला चांगले अन्न मिळून आरोग्य टिकून राहते. उत्तम शेतीसाठी उत्तम मदतनिसाचीही आवश्‍यकता असते. म्हणून मनुष्याने विचारपूर्वक बैलाला शेतीत उपयोगाला आणले. बैलाबरोबर गाय आलीच. दुधासाठी गाईचा उपयोग होतोच, पण शेण व गोमूत्र हे दोन्हीही शेतीसाठी अत्यंत पूरक असतात. शेणखताऐवजी इतर खतांचा उपयोग केल्यामुळे शेतजमिनींचे काय नुकसान झालेले आहे याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. झाडाचा पालापाचोळा, शेण यापासून तयार झालेले खत हे सेंद्रिय शेतीसाठी उपयोगाला येते. खतासाठी गोमूत्र आवश्‍यक असतेच, पण त्याहूनही गोमूत्राचा मोठा उपयोग आहे, कीटकनाशक. झाडांवर, पिकांवर कीड, अळ्या, माशा यांचा प्रादुर्भाव झाल्यास झाडांचे, पिकांचे अतोनात नुकसान होत असते. यासाठी गोमूत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

उपयोग गोमूत्राचे

सध्याच्या आधुनिक काळात मनुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरलेले असताना त्यावर उपचार करताना सेवन केले जाणारे अन्न शुद्ध असणेही महत्त्वाचे आहे हे लक्षात आले, आणि पर्यायाने गोमूत्र व शेण वापरून केलेल्या शेतीचे महत्त्व खूप वाढले. गोमूत्राचे अनेक उपयोग आहेत. गोमूत्राचा अर्क करता येतो. फुलांमधून तेल काढून घेऊन त्यापासून अत्तर बनविले जाते, तसे गोमूत्र उकळून त्याचा क्षार करता येतो. हा अर्क व क्षार औषध म्हणून वापरता येतो. मूत्ररोगांवर गोमूत्राचा उत्तम उपयोग होतो असे सांगितलेले आहे. ताजे गोमूत्र घेण्याचाही खूप उपयोग होऊ शकतो. साधारणतः ५-६ चमचे गोमूत्र सुती कापडातून सात वेळा गाळून घेऊन, त्यात तेवढेच पाणी घालून रोज नियमित घेण्याने फक्‍त शारीरिक लाभ होतात असे नाही, तर व्हायरल इन्फेक्‍शनपासून संरक्षण मिळते. पाळीव गाय, जिचा आहार आपल्याला माहीत असतो, जिला प्रेमाने वागवले जाते अशा गाईच्या गोमूत्राचा वापर करावा असे शास्त्रांत सांगितलेले आहे. वर्षातून एकदा, दोनदा पंचगव्य प्राशन करून शरीरशुद्धी करावी. मोठ्या रोगांना आवरायचे असेल, मानसिक बाधा दूर करायच्या असतील तेव्हा पंचगव्य किंवा साधे गोमूत्र घेण्याने फायदा होतो. मानसिक अस्वस्थता असता, मनाचे रोग झाले असता गोमूत्राचा उपयोग होतो, हे अनेकांना आलेल्या अनुभवावरून कळू शकते.

महत्त्व ‘ए २’ दुधाचे

सध्या ‘ए २’ गाईचे म्हणजे देशी गाईचे महत्त्व लोकांना समजू लागलेले आहे. जी गाय बाहेर उन्हात फिरते, बाहेर कुरणात चरते, जी एका ठिकाणी बांधून ठेवलेली नसते, जिला शिंग व वशिंड आहे, जिला मानसिक दृष्ट्या त्रास होईल अशी शेतकऱ्याकडून वागणूक मिळत नाही, जी स्वच्छ ठेवलेली असेल, विशेषतः जिच्या आचळांची स्वच्छता उत्तम प्रकारे ठेवलेली असेल, ज्या गाईचे शेण-मूत्र गोळा करण्याची नीट व्यवस्था केलेली असेल, अशा गाईचे दूध व गोमूत्र वापरण्यास उत्तम असते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com