आपली शेतीबद्दल असणारी आवड जोपासत एका मुरमाड जमिनीत नंदनवन फुलवणार्या नवदुर्गेचा ऊर्जादायी प्रवास जाणून घेऊया....
- वत्सलाबाई पंढरीनाथ कमानकर (मोहाडी, दिंडोरी)
डोंगराच्या कुशीत वसलेल्या कोऱ्हाटे (ता. दिंडोरी ) या गावी वत्सलाबाईंचा जन्म १९५५ साली झाला. लहानपणापासूनच जिद्दी आणि चपळ असलेल्या वत्सलाताईंचे जुनी ७ वी पर्यंत शिक्षण झाले. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिक्षण सुरू असताना देखील कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्या १ रु., २ रु. रोजाने शेतात कामावर जात, त्यातूनच त्यांना शेतीकामाची आवड निर्माण झाली. १९७२ साली निफाड तालुक्यातील भेंडाळी या गावातील तलाठी पंढरीनाथ तात्याबा कमानकर यांच्याशी वत्सलाताईंचा विवाह झाला. पती नोकरी करत असल्यामुळे सतत वेगवेगळ्या गावात वास्तव्य करावे लागत असे. त्यातच जानोरी येथे त्यांची बदली झाली असताना त्यांनी शिवणकाम करून आपल्या संसारास हातभार लावला.
शेतीची आवड त्यांना काही केल्या शांत बसू देईना. शेवटी त्यांनी आपल्या नातेवाईकांची जमीन बटाईने करण्यास घेतली व त्यात वेगवेगळी पिक त्या घेऊ लागल्या. दुसरीकडे ताईंनी आपल्या दोन मुले व एक मुलगी यांच्याकडे देखील दुर्लक्ष होऊ दिले नाही. वत्सलाताईंची हीच शेतीची आवड पाहता त्यांचे मोहाडीला असलेले त्यांचे मामा तात्याबा पाटील यांनी सन १९८५ मध्ये त्यांना मोहाडी गावात जमीन घेण्याचे सुचविले. येथूनच त्यांचा खऱ्या अर्थाने शेतीप्रवास सुरु झाला. ताईंनी ५ एकराची ही जमीन घेतली खरी पण ती जमीन मुरमाड स्वरूपाची दगड, झाडेझुडपे असलेली होती. ताईंनी स्वतः येथील दगड गोटे गोळा करून ती जमीन शेतीयोग्य बनवली. सन १९८६ साली कोऱ्हाटे गावाहून अडीच कि.मी. पाण्याची पाईपलाईन केली. सुरुवातीच्या काळात भाजीपाला, कांदा अशी पिके केली. पतीची नोकरी व मुलांच शिक्षण चालू असल्याने हि सर्व जबाबदारी त्या एकट्याने पार पडत होत्या. यामध्ये अगदी कांदे लावणीसाठी वावर बांधणी, पाणी भरण्यापासून ते पिकांवर औषध फवारणी करणे हि सर्व कामे त्यांनी स्वतः केली.
सन १९८८ साली द्राक्षपिकांचा अभ्यास करून त्यांनी द्राक्षबागेची लागवड केली. त्यावेळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून द्राक्षपीक यशस्वी करणे खरंतर धाडसाचे होते. सन १९८९ रोजी त्यांनी पहिले द्राक्षपीक घेतले. यांत्रिक साधनांचा त्यावेळी फार अभाव होता. बागेला औषधफवारणी त्या हातपंपाने करत. बाजारपेठ उपलब्ध नव्हती, अशावेळी ओझर ट्रान्सपोर्ट वरून त्यांनी आपली द्राक्षे अहमदाबाद, बडोद्यासारख्या बाजारपेठेत विकली. सुरुवातीला १ एकरची असलेली द्राक्षबाग वाढवूनन त्यांनी २ एकरवर नेली. १९९६ साली हीच द्राक्ष ताईंनी निर्यात करण्यास सुरुवात केली. येथूनच त्यांच्या द्राक्षशेतीच्या विकासाला सुरुवात झाली. २००० साली शेजारील ५ एकराचे क्षेत्र ताईंनी खरेदी करून त्यावर देखील द्राक्षपिकांची लागवड केली. पुढे केवळ शेतीवर अवलंबून न राहता काहीतरी जोडधंदा केला पाहिजे या विचारातून ताईंनी भागीदारीमध्ये दूध डेअरीचा व्यवसायदेखील चालवण्याचा प्रयत्न केला. आज वत्सलाताईंनी १ एकराची असलेली द्राक्षबाग १० एकर निर्यातक्षम द्राक्षबागेवर आणली. सोबतच आपल्या तीनही मुलांना उच्चशिक्षित केले. मोठा मुलगा रविंद्र इंजीनियर, मुलगी विजया बी.ए., तर लहान मुलगा प्रदीप देखील बी.ए. होऊन आज द्राक्षशेतीत उत्तम काम करत आहे.
आज वयाची ७० वर्षे पूर्ण होऊन देखील आजही ताई कुटुंबासमवेत आपली द्राक्षबाग अतिशय कार्यक्षमतेने सांभाळत आहेत. शेतात फुलझाडांपासून ते फळझाडांपर्यंत विविध झाडे लावलेली आहेत. याव्यतिरिक्त घरी लागणारा भाजीपाला हा घरच्याच शेतीतून यावा यासाठी छोटीशी सेंद्रिय परसबाग देखील केली आहे. ज्या ठिकाणी लोकांना जाण्याची भीती वाटते अश्या मळ्याच्या वस्तीला राहण्यास जाऊन अगदी मुरमाड जमिनीत देखील त्यांनी यशस्वीरीत्या शेती करून दाखवली, ज्याला ताईंच्या या मेहनतीकडे पाहता 'वत्सल फार्म' हे नाव दिले. वत्सलताईंच्या या ऊर्जासंपन्न व्यक्तिमत्वास सलाम!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.