स्री उद्धारक पंडिता रमाबाई

जागतिक पातळीवरील समाजसेविका पंडिता रमाबाई
 पंडिता रमाबाई
पंडिता रमाबाईsakal

जागतिक पातळीवरील समाजसेविका पंडिता रमाबाई यांनी ५ एप्रिल १९२२ रोजी केडगाव येथील त्यांच्या कर्मभूमीत आपला देह ठेवला. अलौकीक सामाजिक कार्य, स्त्री शिक्षण, आध्यात्म या तीन गोष्टींचा वारसा रमाबाईंनी दिला आहे. त्यांचे जीवन कार्य हे रूढी परंपरांना हादरे देणारे होते. १०० व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा. पंडिता रमाबाई यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ साली झाला. त्यांचे वडील चितपावन ब्राम्हण असलेले अनंतशास्त्री डोंगरे हे फार विद्वान व स्त्री शिक्षणाचे कैवारी होते. वेद व संस्कृतचे पारंगत होते. पत्नीला संस्कृत भाषा शिकवली म्हणून त्या काळी त्यांना समाज बहिस्कृत केले तरी अनंतशास्त्री मात्र; आपल्या कार्यावर ठाम होते.

पंडिता रमाबाईंवर त्यांनी चांगले संस्कार केले. तीलाही संस्कृत शिकवले. वयाच्या १२ वर्षी रमाबाईंना धर्मग्रंथातील १८ हजार श्लोक तोंडपाठ होते. त्या जागेवरच संस्कृत काव्य करत. संस्कृतमध्ये प्रवचने देत. भारत भ्रमण करत असताना त्या कलकत्यात आल्या. तेथे त्यांच्या विद्वत्वेला व्यापक प्रसिद्धी मिळाली. कलकत्यातील विद्वत्व सभेने त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला. महिलांना पदव्या देण्याचा हा काळ नसताना सभेने त्यांना १८७८ मध्ये 'पंडिता' व 'सरस्वती' या दोन पदव्या बहाल केल्या. १३ जून १८८० मध्ये कलकत्यातील बिपीन मेघावी यांच्याशी विवाह झाला. १६ एप्रिल १८८१ मध्ये त्यांना मनोरमा ही कन्या झाली. रमाबाईंना संसारसुख फार काळ लाभले नाही.

१८८२ मध्ये बिपीन मेघावी यांचे निधन झाले. त्यांचे वैयक्तिक जीवन अनेक संकटांनी भरलेले होते. पतीच्या निधनानंतर रमाबाई या मुंबईत आल्या. पुणे, मुंबई, सोलापूर, ठाणे, नगर, येथे फिरून त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. या नव्या कार्यात न्यायमुर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी त्यांना सहकार्य केले. अमूक एक क्षेत्र स्त्रियांचे नाही हे रमाबाईंना कधीच पटले नाही.

२० एप्रिल १८८३ ला त्या इंग्लडला गेल्या. रमाबाईंचे या पुढील आयुष्य वेगळ्याच मार्गाने सुरू झाले. ख्रिस्ती धर्मातील मानवतावादी तत्वांमुळे त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले. २९ सप्टेंबर १८८३ साली इंग्लडमधील वाँटेज येथे रमाबाईंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने भारतात तेव्हा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी हिंदू धर्म सोडला तरी भारतीयत्वाचा त्याग केला नव्हता. धर्मांतरानंतरही त्यांच्या कार्याला अनेक हिंदू नेत्यांचा पाठिंबा होता. काळाचा विचार करता त्यांचे बहुतेक निर्णय हे असाधारण होते.

१८८६ मध्ये त्या अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी भारतातीतल विधवा, अनाथ, बाल विधवा, अपंग, अंध, स्त्रियांच्या उन्नतीसाठी मदत मागितली. अमेरिकेतील दानशूर व्यक्तिंनी त्यांना मदत केली. रमाबाई भारतात परत आल्या त्या नव्या उमेदीने. त्यांनी भारतात आल्यानंतर ११ मार्च १८८९ रोजी त्यांनी शारदा सदनची स्थापना केली. विधवा गोदूबाई ही रमाबाईंची मानसकन्या व शारदा सदनची विद्यार्थीनी होती. शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी या गोदूबाईशी विवाह केला. पुढे त्या आनंदीबाई कर्वे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मुलींना शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. बाल विधवा, विधवा, निराधार, अपंग यांचा मोठा ओघ रमाबाईंकडे सुरू झाला. रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र रमाबाईंनी त्याची तमा बाळगली नाही.

कार्य वाढू लागल्याने मुंबईतील शारदा सदन पुण्यात आणि नंतर केडगाव ( ता.दौंड ) येथे ( २४ सप्टेंबर १८९८ ) हलविण्यात आले. केडगावला १०० एकर जमीन घेऊन त्यांनी येथे विस्ताराने कार्य सुरू केले. केडगावात १० हजार चौरस फुटांचे चर्च उभारले. अत्याचारीत स्त्रियांवरील प्रेम आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी २००० महिलांचा सांभाळ केला. पंडिता रमाबाई मुक्ति मिशनमध्ये आजही ही सेवा चालू आहे.अनाथ, दिव्यांग मुली, अंध, निराधार, विशेष महिला मिशनमध्ये येतात. येथे त्यांना संरक्षण मिळते. स्वतःच्या पायावर उभे केले जाते. ब्रिटीश सरकारने रमाबाईंना कैसर-ई-हिंद हा किताब देऊन गौरविले. रमाबाईंना १६ भाषा येत होत्या. केडगावात ब्रेल लिपीतून अंध महिलांना शिक्षण दिले. रमाबाईंच्या भाषणामुळे हिक्टोरिया राणीला भारतात महिलांसाठी दवाखाने सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. १८८२ साली महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रमाणे हंटर कमीशनपुढे रमाबाईंनी स्त्री शिक्षणाची गरज भक्कमपणे मांडली. स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण मिळाले पाहिजे असा आग्रह त्यांनी मांडला.

ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी बायबलचा सखोल अभ्यास केला. बायबल ग्रंथातील ज्ञान मराठी मुली, महिलांना व्हावे म्हणून त्यांनी बायबलच्या भाषांतराचे काम हाती घेतले. हे काम १८ वर्ष चालू होते. भाषांतराचे काम ज्या दिवशी संपले त्याच रात्री त्यांचे निधन झाले. रमाबाईंनी सुरू केलेले कार्य आजही केडगावात चालू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com