चीन सीमेवर ३५ हजार सैनिक; जवानांची एकाचवेळी शत्रू आणि निसर्गाशी झुंज 

solider
solider

नवी दिल्ली - चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील सीमेवरील फौजफाटा आणखी वाढवायला सुरवात केली आहे. चीनला लागून असणाऱ्या सीमावर्ती भागामध्ये भारताकडून ३५ हजार अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या जवानांना सियाचीन, पूर्व लडाख आणि ईशान्येकडील प्रतिकूल वातावरणात काम करण्याचा अनुभव आहे. भारतीय जवानांनीही एकाचवेळी निसर्ग आणि शत्रू राष्ट्राच्या संकटाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी केली आहे.भारतीय सैन्याला प्रतिकूल वातावरणामध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे पण चीनने मात्र दुर्गम भागातून माघार घेतल्याचे दिसून येते. अतिशीत वातावरणामध्ये भारतीय जवानांना काम करणे शक्यता व्हावे म्हणून त्यांना पोर्टेबल कॅबिनदेखील पुरविल्या जाणार आहेत. 

भारताच्या अतिरिक्त लष्करी बळामुळे ताबारेषेवरील स्थितीमध्ये बदल होऊ शकतो, अशी शक्यता संरक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. 

या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने याआधीच लष्कराच्या अर्थसंकल्पामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. 

उभय देशांमध्ये ताबा रेषेवर १५ जून रोजी झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी आपआपले लष्करी सामर्थ्य दाखविण्यासाठी फौजफाटा वाढविण्याबरोबरच अत्याधुनिक शस्त्रेही तैनात केली आहेत. एकीकडे दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना दुसरीकडे मात्र सीमेवरील तणाव मात्र वाढत चालल्याचे दिसून येते. सध्या केवळ लडाखमधील ताबारेषेचा विचार केला तरीसुद्धा स्थितीमध्ये मोठा बदल झालेला दिसून येईल, याचे स्वरूप पूर्वीसारखे राहिलेले नाही,असे दिल्लीतील युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे संचालक निवृत्त मेजर जनरल बी. के. शर्मा यांनी सांगितले. उच्चस्तरीय राजकीय पातळीवर चर्चा होत नाही तोवर तैनात करण्यात आलेला अतिरिक्त फौजफाटा मागे घेतला जाण्याची शक्यता कमीच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

भारताची तयारी 
थंडी आधीच तंबू, छावण्यांच्या उभारणीस वेग 
औषधे, खाद्यपदार्थ, इंधनही सीमेवर रवाना 
लष्करी साहित्याच्या संशोधन, खरेदीला वेग 
हवाई दलाच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ 
लष्कराकडून अतिरिक्त तंबूंची मागणी 

गणित बदलावे लागेल 
आजही लष्करामध्ये फार मोठा खर्च जवान आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर होतो. १.३ दशलक्ष जवानांच्या वेतनावर ६० टक्के एवढा खर्च होतो. यातून शिल्लक राहिलेली रक्कम ही शस्त्र सामग्रीच्या खरेदीवर खर्च केली जाते. या गणितामध्ये बदल झाल्याशिवाय लष्कराच्या सामर्थ्यामध्ये सुधारणा होणार नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. 

(Edited by : Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com