नवी दिल्ली : 'एकविसाव्या शतकामध्ये भारतामध्ये गरीब नागरिक आहेत, हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला या देशात गरीबांना सन्मान मिळवून द्यायचा आहे. ही आता आमची गरीबीविरोधातील शेवटची लढाई असेल', अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा 'गरीबी हटाओ'ची घोषणा दिली.
तब्बल 48 वर्षांनंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा 'गरीबी' हाच मुद्दा काँग्रेसने झळकाविला आहे. 1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'गरीबी हटाओ'ची घोषणा दिली होती. इंदिरा गांधींच्या या प्रचाराला दणदणीत प्रतिसाद मिळाला होता. 'ते म्हणतात इंदिरा हटाओ, मी म्हणते गरीबी हटाओ' अशी घोषणा इंदिरा गांधी यांनी केली होती. या प्रचारातून इंदिरा गांधी यांनी समाजातील विविध थरांमध्ये काँग्रेसला पाठिंबा मिळवून दिला होता.
आता 2019 च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा याच घोषणेचा आधार घेतला आहे. पुन्हा एकदा याच घोषणेला 'गेम चेंजर' ठरविले जात आहे. 'देशात सत्तेत आल्यानंतर 20 टक्के गरीब कुटुंबांना दर वर्षी 72 हजार कोटी रुपये मदत दिली जाणार आहे', असे आश्वासन गांधी यांनी आज दिले. 'भारतातून गरीबी हद्दपार करण्यासाठी ही पावले उचलत आहोत', असा दावा गांधी यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या विद्यमान भाजप सरकारविरोधात काँग्रेसने सुरवातीपासून 'सूट-बुट की सरकार' ही टीका केली होती. त्यानंतर राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपसत्रामध्येही काँग्रेसने 'तुमच्या खिशातून पैसे काढून अनिल अंबानींचे खिसे भरले गेले', असा दावा केला आहे.
जवळपास पाच दशकांनंतर काँग्रेसने पुन्हा एकदा 'गरीबी हटाओ'चा आधार घेतला आहे. पण 48 वर्षांपूर्वीच्या जुन्या घोषणेवरच पुन्हा निवडणूक जिंकता येईल का?
'मोदी हटाओ' मोहीमेसाठी 'गरीबी हटाओ' काँग्रेसला हात देईल का?
मांडा तुमचे मत!
पाठवा तुमचे मत webeditor@esakal.com वर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.