नवी दिल्ली : कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या शक्तींना भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करू देणार नाही,असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी आज सांगितले.
भारतीय हवाईदलाच्या ८९ व्या वर्धापनदिनानिमित्त गाझियाबादेतील तळावर झालेल्या कार्यक्रमात बोलताना चौधरी यांनी आपण अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हवाई दलप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली असून याची आपणास कल्पना आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीय हवाई क्षेत्रात कोणालाही आक्रमण करू दिले जाणार नाही. आम्ही पूर्ण सज्ज आहोत. पूर्व लद्दाखमधील घटनाक्रमात हवाई दलाने उचापतखोरांना चोख प्रत्युत्तर देताना केलेली कामगिरी भारताच्या युद्धतत्परतेचा पुरावा आहे. यापुढेही कोणत्याही स्थितीत हवाई हद्दीतील अतिक्रमण सहन करणार नाही. हवाई दलाने तंत्रज्ञानाधारिक परियोजनांबाबतीत आत्मनिर्भर बनणे ही काळाची गरज आहे असे सांगून चौधरी म्हणाले,की नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारणे व अंगिकारणे ही आमची दीर्घकाळापासूनची शक्ती बनलेली आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की या दृष्टीने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि प्रशिक्षितही केले पाहिजे.
हवाई दलाची स्थापना ब्रिटीशकाळात ८ आॅक्टोबर १९३२ रोजी झाली. १ एप्रिल १९३३ रोजी या दलाच्या पहिल्या तुकडीची नियुक्ती झाली. तीत ६ प्रशिक्षित हवाई अधिकारी व १० शिपाई यांचा समावेश होता. दुसऱया महायुद्धात हवाई दलाने मोठी कामगिरी केली होती. स्वातंत्र्यानंतर हवाई दलाच्या नावातील ‘रॉयल'' शब्द हटविण्यात आला. आज भारतीय हवाई दलाने आपले सामर्थ्य इतके वाढविले हे की हे दल अमेरिका, रशिया व चीनच्या पाठोपाठ जगातील चोथे शक्तीशाली दल आहे.
"हवाई दल हे साहस, तत्परता व दक्षता यांचे प्रतीक आहे. जवानांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःस पारंगत केले आहे व आव्हानांच्या काळात मानवतेला अनुकूल असे काम केले आहे. हवाई दल वर्धापनदिनाच्या निमित्ताने सर्व योद्ध्याना शुभेच्छा."
- पंतप्रधान नरेंद्र मोदी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.