पणजी : लहान मुलांमध्ये असणारी सृजनशीलता ओळखून मुलांनी त्या कलेत प्राविण्य मिळवावे म्हणून पालकांनी प्रयत्न करायचे असतात. मुलांनी अभ्यास करणे आवश्यक असले तरी त्यांच्यातील कलेला योग्य वाव मिळणे आवश्यक असते. कला ही विद्यार्थ्याची एकाग्रता वाढविते, त्यामुळेच कलाकार प्रचंड संयमी असतात, असे मत राज्याचे वीज पुरवठामंत्री पांडुरंग मडकईकर यांनी व्यक्त केले.
बालभवन, गोवा तर्फे पणजीतील कला अकादमीत बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री बालभवनच्या अध्यक्ष शीतल नाईक, कार्यक्रम प्रमुख शशिकांत पुनाजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या संस्थाची जेव्हा नावे घेतली जातात. तेव्हा त्यामध्ये आवर्जून बालभवनचे नाव घेतले जाते. उन्हाळी शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी प्रेम निर्माण करणाऱ्या या संस्थेने यावर्षी 52 केंद्राच्या माध्यमातून सुमारे 15000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे, आणि ही बाब कौतुकास्पद आहे, असेही मंत्री मडकईकर म्हणाले.
यावेळी गोमंत बालभूषण पुरस्कारप्राप्त नीतिश नाईक, तनिषा शेणवी मावजेकर, सिद्धी गावडे आणि सोमनाथ गावकर या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी गायन आणि नृत्याचे कार्यक्रमही सादर केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनही यावेळी कला अकादमीत भरविण्यात आले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.