Arvind Kejriwal On EVM : ‘ईव्हीएम’मध्ये गडबड होऊ शकते; अरविंद केजरीवाल यांचा दावा

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मार्च महिन्यात केजरीवाल यांना अटक केली होती.
Arvind Kejriwal On EVM
Arvind Kejriwal On EVMSakal

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी पोलिसांसमोर शरण गेले. केजरीवाल यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी झाली आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत ‘ईव्हीएम’मध्ये हेराफेरी होण्याच्या शक्यतेचा पुनरुच्चार केला. केजरीवाल यांच्या नियमित जामिनावर येत्या बुधवारी (ता. ५) विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मार्च महिन्यात केजरीवाल यांना अटक केली होती. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करायचा असल्याने अंतरिम जामीन दिला जावा, अशा त्यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य करीत १ जूनपर्यंत जामीन मंजूर केला होता.

जामिनाची मुदत संपल्यानंतर केजरीवाल यांनी आज तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले. तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी राजघाट येथे जात महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच हनुमान मंदिरात जाऊन पूजाही केली. यानंतर पक्ष कार्यालयात जाऊन केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

‘ईव्हीएम’मध्ये गैरव्यवहार होत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. आपला उमेदवार पराभूत होत असला तरी मतदानकेंद्र प्रतिनिधींनी शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नये, असे आपण इंडिया आघाडीतील घटक पक्षांना सांगितले आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ते म्हणाले,‘‘मतमोजणीच्या अखेरीस मशिनमधून स्लिप निघतात.

यातील पाच टक्के स्लिप उचलल्या जातात. त्याची जुळवणी ईव्हीएमच्या आकडेवारीशी केली जाते. एकाही मशिनमध्ये आकड्यांची जुळणी होत नसेल तर निवडणूक रद्द केली जाते. या बाबीची तपासणी केली, तर ईव्हीएम गैरव्यवहार सिद्ध होऊ शकतो. त्यामुळे आपला एखादा उमेदवार पराभूत होत असला तरी अखेरपर्यंत मतदान मोजणी केंद्रांवर थांबा.’’

‘भाजपकडून दबाव’

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरही टीका केली. ‘‘भाजपवाल्यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा लावला आहे. त्यांना हा पैसा वाचवायचा आहे. उद्या जेव्हा मूल्य वाढेल, तेव्हा त्यांना शेअर विकून टाकायचे आहेत. म्हणूनच भाजपवाले अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत,’’ असा आरोप केजरीवाल यांनी केला. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये कमी जागा मिळाल्या तर रा. स्व. संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात बंड होईल, असा विषय देखील चर्चिला जात असल्याचे केजरीवाल म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com