भारत बंद - देशभरात काय सुरु राहणार काय बंद?

farmers
farmers

नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला चार महिने होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांच्यावतीने भारत बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे देशातील अनेक भागात आज वाहतुकीसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असून बाजारपेठाही बंद राहतील. कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंद पुकारला आहे. देशात विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांत हा बंद नाही. संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार देशव्यापी बंद 26 मार्चला सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अशणार आहे. याबाबत शेतकरी नेते दर्शनपाल यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून बंद काळात भाजीपाला, दूध यांचाही पुरवठा रोखण्यात येईल असं म्हटलं आहे. 

भारत बंदमध्ये काय सुरु आणि काय बंद राहील याबाबत संघटनेच्यावतीने माहिती देण्यात आली आहे. यात म्हटलं आहे की, भारत बंदमध्ये सर्व दुकानं, मॉल, बाजारपेठा, संस्था बंद राहतील. सर्व लहान आणि मोठे मार्ग ब्लॉक करण्यात येतील. तसंच ट्रेनसुद्धा अडवण्यात येतील. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या वाहनांना सोडून इतर सेवा रोखणार असल्याचा इशाराही नेत्यांनी दिला आहे. भारत बंदचा सर्वाधिक प्रभाव दिल्लीत दिसेल. शेतकऱी संघटनांनी बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. ज्येष्ठ शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितलं की, रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखली जाईल, तसंच बाजारही बंद राहतील. 

दिल्लीतही बंद पुकारला असून राजेवाल यांनी सांगितलं की, संघटीत आणि असंघटीत क्षेत्राशी संबंधित ट्रेड युनियन आणि वाहतूकीसह इतर संघटनांनीसुद्धा भारत बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे रुळांवर ठिय्या मांडून बसतील. भारत बंदवेळी बाजार आणि वाहतूक व्यवस्था बंद राहील. दरम्यान, देशातील कोट्यवधी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने म्हटलं की, 26 मार्चला बाजार सुरु राहील कारण आम्ही त्यात सहभागी होणार नाही. 

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं की, '26 मार्चच्या भारत बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही. दिल्ली आणि देशाच्या इतर भागात बाजार सुरुच राहील. या प्रश्नावर फक्त चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. कृषी कायद्यात सुधारणांवर चर्चा व्हायला हवी. ज्यातून सध्याच्या शेतीला फायदा होण्याच्या दृष्टीने बदल करता येतील.' भारत बंदचा मोठा प्रभाव हरियाणा आणि पंजामध्ये होईल. तर तामिळनाडु, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरीमध्ये हा बंद असणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com