Nitish Kumar on Lalu Yadav : बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे. सरकारच्या बाजूने १२९ मतं पडली आहेत. त्यापूर्वी बहुमतावर चर्चा करताना नितीश कुमार जुन्याच अंदाजात दिसले. त्यांनी तेजस्वी यादवांपासून ते लालू प्रसाद यादवांपर्यंत सगळ्यांना निशाण्यावर घेतलं. त्यासोबत महाआघाडीतून वेगळं होण्याचं कारण स्पष्ट केलं.
नितीश कुमार म्हणाले की, २००५ पासून मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत १८ वर्षे झाली. मध्येच ९ महिने वेगळा निर्णय घेतला. परंतु लालू-रबडी यांनी १५ वर्षे काम केलं तेव्हा काय होत होतं. जेव्हा आम्हाला कामाची संधी मिळाली तेव्हा आम्ही काम केलं. आरजेडी म्हणतं की, आमच्यासोबत मुस्लिम आहेत. पण मग त्यांच्या काळात हिंदू-मुस्लिम वाद का होत होते.
मुख्यमंत्री नितीश कुमार पुढे म्हणाले की, आम्ही मुस्लिमांसाठी काम उभं केलं. समाजाच्या प्रत्येक घटकाची उन्नती करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राजदच्या आमदारांनी गदारोळ सुरु केल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, तुम्हाला नेमकं झालंय काय? तुम्ही ऐकून घेण्याच्या तयारीत नाहीत.
''आम्ही त्यांना दोनदा संधी दिली. काय काय करायचं ते सांगितलं. जेव्हा २०१५ मध्ये आम्ही आलो तेव्हा सात ठराव केले. ते काम माझं आहे. सात ठराव २ चंही काम मीच केलेलं आहे. परंतु क्रेडिट ते घेत आहेत.''
नितीश कुमार पुढे म्हणाले, अगोदर शिक्षणमंत्री माझा होता. परंतु नंतर राजद आलं आणि त्यांच्याकडे ते खातं गेलं. मग गडबड झाली. काँग्रेसला कमी मंत्रिपदं मिळण्याचं कारणही नितीश यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री पुढे बोलले, मला कळलं की काँग्रेससुद्धा इकडे-तिकडे करत आहे. तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधताना नितीश कुमार म्हणाले, ह्यांचे वडीलसुद्धा (लालू प्रसाद यादव) त्यांच्या सोबत होते. त्यांना माझी अडचण होती. आता आम्ही इथे कायमस्वरुपी आलेलो आहोत, चिंता करु नका.
''आम्ही कुणाचं नुकसान करणार नाहीत. सगळ्यांसाठी काम करणार आहोत. काँग्रेसच्या आमदारांना काही अडचण असेल तर त्यांनी बिनदिक्कतपणे माझ्याशी संपर्क साधावा. मी सगळ्यांना एकत्रित करत होतो परंतु काँग्रेसला अडचण वाटत होती. लालू प्रसाद यादव हेसुद्धा काँग्रेससोबत होते. आता आम्ही इथेच राहू, कुठेही जाणारर नाही.'' असं नितीश म्हणाले.