कोलकता : पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांचा तपास करणारे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) काही अधिकारी हे ‘तृणमूल’ला विकले गेले आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. या कारणामुळेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या प्रकरणांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सोपविली असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे माजी राज्य प्रदेशाध्यक्ष असलेले घोष हे कोलकतामधील ‘आयसीसीआर’च्या रविवारी (ता.२१) झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी तृणमूलसंदर्भात केलेल्या आरोपाप्रमाणेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही विविध गैरव्यवहारांत अडकलेल्या भाजप, तृणमूल काँग्रेसचे तपास यंत्रणांबरोबर ‘साटेलोटे’ असल्याचा आरोप याआधी केला होता. ‘माकप’चा रोख राज्यातील शिक्षक भरती, शारदा चिटफंडकडे होता. पण नंतर शिक्षक भरती गैरव्यवहारात ‘सीबीआय’ने बंगालचे तत्कालीन मंत्री पार्थो चॅटर्जी यांना अटक केल्यानंतर ‘माकप’चे नेते शांत झाले.
‘‘सीबीआय’चे काही अधिकारी तृणमूल काँग्रेसला विकले गेले असल्यानेच कोळसा गैरव्यवहार, गुरे तस्करी आणि शिक्षक भरतीमधील अनियमिततेची चौकशी होऊनही कोणतीही कागदपत्रे बाहेर आलेली नाहीत व त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. ‘सीबीआय’च्या काही अधिकाऱ्यांना ‘तृणमूल’कडून लाखो -करोडो रुपये मिळाले आहेत. यानंतर काही अधिकाऱ्यांची बदली झाली असून ही प्रकरणे ‘ईडी’कडे सोपविली आहेत, असेही मी ऐकले आहे,’’ असे घोष म्हणाले.
‘घोष यांनी विचारपूर्वक बोलावे’
घोष यांनी यापूर्वी वादग्रस्त वक्तव्ये करून भाजपला अडचणीत आणलेले आहे. त्यांचे ‘सीबीआय’संदर्भातील आरोपांमुळे भाजपसाठी नवा पेच निर्माण होण्याची शक्यता पक्षातील काही नेते खासगीत व्यक्त करीत आहेत. घोष यांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. शिक्षक भरती प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असल्याबद्दल ‘माकप’ आणि काँग्रेसनेही सवाल उपस्थित करीत भाजप व तृणमूल काँग्रेसचे साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे.
सुवेंदू अधिकारी यांना अभय?
‘सीबीआय’ पंतप्रधानांच्या अखत्यारित येते, या दिलीप घोष यांच्या विधानाचा संदर्भ घेत तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाचे सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले, की म्हणूनच शारदा चिटफंड आणि नारद ‘स्टिंग ऑपरेशन’प्रकरणातील ‘एफआयआर’मध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे नाव त्यांना अभय मिळून ते मुक्तपणे फिरत आहेत.
तृणमूल काँग्रेसचा दणदणीत विजय
शिक्षक भरती आणि गुरे तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालमधील दोन मंत्र्यांना अटक झाल्याने तृणमूल काँग्रेस पक्षाची प्रतिमा डागळली आहे. पण याचा कोणताही नंदिग्राम येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसला नाही. पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदिग्राम स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक रविवारी (ता.२१) झाली. त्यात ५२ जागांपैकी ‘तृणमूल’ने ५१ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. एक जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळाली. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचा नंदिग्राम हा मतदारसंघ असून कंठी हे त्यांचे मूळ गाव आहे. सिंगूरमध्ये ‘माकप’चा पराभव करीत तृणमूल काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजे नऊ जागा मिळविल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.