

मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर संभाजीनगर शहरात सत्तार यांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे भरवत जल्लोष करण्यात आलाय. संदिपान भुमरे खासदार झाल्यानंतर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू होती अखेर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची वर्णी पालकमंत्री पदी लागली.
अब्दुल सत्तार यांच्या पालकमंत्री पदावरून मनसेने टीका केली आहे. मारुतीरायाला शिव्या घालणारे अब्दुल सत्तार यांची संभाजी नगरच्या पालकमंत्री पदी वर्णी, यावरून शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न उपस्थित होतोय? असं ट्वीट मनसेने केलं आहे.
कारगिल युद्धातील शहीद सैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानवंदना देणार आहेत. कारगिल युद्धातील सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणार.
26 जुलै रोजी शिवसेना सैनिक सेलच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा होणार. मुंबई महानगरपालिकेच्या समोरील शहीद स्मारकात कारगिल सैनिकांना मानवंदना दिली जाणार.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहले आहे. मतदार यादीतील त्रुटींवर फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले. विधानसभा निवडणूक पूर्वी त्रुटी दूर करण्यासाची त्यांनी मागणी केली.
महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याचा मेसेज खोटा असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
नाशिकच्या दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, संध्याकाळी ६ वाजल्यापासून दारणा धरणातून ६२४ क्यूसेकनं वाढवला विसर्ग
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपतविधीचा मुहर्त ठरला आहे. येत्या रविवारी २८ जुलैला ११ विधान परिषदेचे आमदार शपत घेणार आहेत.
पुणे, दि. २४: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यांच्या अनुषंगाने पेरिविंकल इंग्रजी माध्यम शाळा सुस, डॉल्फिन इंग्रजी माध्यम शाळा तापकीर वस्ती, विद्या व्हॅली शाळा सुस, श्रीनिवास पुर्व प्राथमिक शाळा, नानासाहेब ससार इमारत सुस, आदित्य पूर्व प्राथमिक शाळा, पारखे वस्ती सुसगांव, पोद्दार जंबो किड्स सुसगांव, ट्री हाऊस माध्यमिक शाळा, पारखे वस्ती सुसगांव, आर्चिड आंतरराष्ट्रीय शाळा सुस, जिल्हा परिषद शाळा सुसगांव कमान, संस्कारोदय प्राथमिक शाळा, शितळादेवीनगर, लिटील बेरीएस पूर्व प्राथमिक शाळा ठकसेन नगर, किड्झी पूर्व प्राथमिक शाळा सुसगांव, श्री विद्या पूर्व प्राथमिक शाळा व ध्रुव ग्लोबल शाळा सिम्बायोसिस लवळे या शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पाणी पुरवठा करणारे तानसा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. हे धरण 4 वाजून 16 मिनिटे यावेळी ओव्हर फ्लो झाले, यानंतर धरणाचे स्वयंचलित तीन दरवाजे उघडण्यात आले असून यामधून 3315 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोणावळा परिसरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. तसेच हवामान विभागाकडूनही पुढील दोन दिवस दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षा विचारात घेऊन, लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील शाळांना उद्या व परवा असे दोन दिवस विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी शिक्षक व कर्मचारी यांनी परिस्थिती पाहून शालेय कामकाज सुरू ठेवावे असे सांगण्यात आले आहे.
लोणावळ्यात अवघ्या नऊ तासांत 145 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यानच्या पावसाची ही नोंद आहे. तर काल दिवसभरात 275 मिलिमीटर पाऊस कोसळला होता.
धाराशिव : धाराशिव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या अंगरक्षक असे चार जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे आपल्या अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रावर फिरत होते त्यामुळे मतमोजणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दबाव निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
ओमराजे उमेदवार असले तरी ते अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात जावु शकत नाहीत असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तक्रारीवरून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी सिसिटिव्ही फुटेज तपासून आचारसंहिता भंग झाला की नाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिस अधिक्षकांनी अहवाल सादर केल्यानंतर गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आदेश दिले
मनोज जरांगे यांची मागणीच बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्यांना हे आंदोलन स्थगित करावे लागले. आरक्षणाच्या नावाखाली ते वर्चस्ववादाची लढाई लढत आहेत. त्यांचे आंदोलन हे बेकायदेशीर आहे, संविधान विरोधी आहे. त्यांचे आंदोलन हे पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी होते, त्यांचे आंदोलन हे जानकर यांचा पराभव करण्यासाठी होते. अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी ही आपली मागणी पुढे नेली असून त्यामुळे त्यांना हे आपले आंदोलन मागे घ्यावे लागले. उपोषण स्थगित करावे लागले, अशी टीका प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जनसंवाद दौऱ्यात प्राध्यापक हाके हे सध्या बीड जिल्ह्यात असून त्यांच्या या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे आज कळंबा तलाव ‘ओव्हरफ्लो‘ झाला आहे. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारा हा ऐतिहासिक तलाव आहे.
शंभूराजे देसाई मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले?
मराठा आरक्षणाबाबत नियमित बैठक झाली
मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार आढावा घेतला
सगे सोयऱ्यांच्या ड्राफबाबत आढावा घेतला
यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीतील मुद्द्यांवर विधी-न्याय विभाग काम करत आहे
तेलंगणामधील अधिकाऱ्यांशी आपले सचिव बोलत आहेत. हैदराबाद गॅजेटचे सर्टिफाय डॅाक्युमेंट त्यांनी आपल्याकडे पडताळणी केल्याबाबत सूचना दिल्या
मनोज जरांगे पाटील यांना भेटून आल्यावर एका महिन्यात ही काम झाली
मला डॅाक्टरांनी कळवल की, त्यांनी रात्री औषध घेतले. त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
सरकारने आश्वासन दिल आहे. त्यावरुन मागे हटणार नाही. मी याबाबत रोज आढावा घेत आहे
इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या वन्समोर अशा शब्दांमुळे सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील मराठी भाषा तपासण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा जोर कायम आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नागरिकांना पुराचा धोका आहे. पुराच्या भीतीने अनेक नागरिकांनी स्थलांतर करण्यात सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील तणाव वाढतोय असं म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारने लवकरात लवकर विचार करावा आणि तोडगा काढावा असं त्यांनी म्हटलं.
राहुल गांधी म्हणाले आमच्या जाहीरनाम्यात, आम्ही कायदेशीर हमीसह एमएसपीचा उल्लेख केला आहे. आम्ही मूल्यांकन केले आहे आणि ते लागू केले जाऊ शकते. आत्ता आमची बैठक झाली होती जिथे आम्ही बोलू असे ठरवले होते. देशातील शेतकऱ्यांना MSP कायदेशीर हमी देण्यात यावी यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी INDIA आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत.
कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात एकूण कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर संघटित दगडफेकीचे प्रमाण शून्य आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिले.
पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती. म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार शिवाजीराव आढळराव पाटील.
खडकवासला धरण भरल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील रस्ता तसेच भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
राज्यात पुन्हा एकदा सकल हिंदू मोर्चांना सुरूवात होणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.
भंडारा जिल्ह्यात धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्यीय पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण ८५ टक्के भरलं असून, धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून ९ हजार ४१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा.
पंचगंगेची पातळी रात्री एक वाजता ४१.९ फूट इतकी होती. दरम्यान, बावडा-शिये मार्ग रात्री उशिरा बंद करण्यात आला. कोल्हापूर-रत्नागिरी, गगनबावडा-कोल्हापूर आदी शहरात येणारे रस्ते बंद झाले असून, पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे.
इंडिया आघाडीचं संसद भवनाबाहेर आंदोलन सुरु झाले आहे. अर्थसंकल्पामध्ये राज्या-राज्यांमध्ये भेदभाव करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. संसदेबाहेर विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे.
उपमुख्यमंत्री रात्री दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. ते आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित असतील.
कोल्हापूर जिल्ह्यातीन अनेक मार्ग पावसामुळे बंद करण्यात आले आहेत. पंचगगा नदी धोक्याच्या पातळीवर आली आहे. त्यामुळे परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत. शिवसेना फोडल्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. नाहीतर त्यांचे कर्तृत्व काय आहे. दिल्लीने महाराष्ट्राला कंगाल केलं, असं संजय राऊत म्हणाले.
ओतूर : कोळवाडी (ता. जुन्नर) या ठिकाणी हटकेश्वराला लागूनच असलेला वऱ्हाडी डोंगराचा काही भाग कोसळून मोठमोठे दगड गोटे गावच्या दिशेने खाली आले आहेत. डोंगरावरून कोसळून आलेले दगड व मातीचा मलबा झाडांमध्ये व डोंगराच्या असलेल्या कड्याच्या बाजूला अडकले असून हा भाग धोकादायक झाला आहे.
राष्ट्रीय जनता दल (राजद) सुप्रिमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मंगळवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 ते 26 जुलै दरम्यान गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, केरळ आणि माहे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी IMD ने रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
बेळगाव : पावसाचा जोर कायम असल्यामुळे बेळगाव शहरासह बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर तालुक्यांतील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांसह अंगणवाडींना बुधवारी (ता. २४) सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी बजावला आहे.
सांगलीत गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. चांदोली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अशातच आज (बुधवार) सकाळी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.
बिद्री : येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईविरोधात कारखाना व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी बाविसाव्या क्रमांकाला ही याचिका बेंचवर येणार होती; परंतु आधीच्या याचिकांवरील सुनावणीला विलंब झाल्याने सुनावणी आज बुधवारी घेणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
आज खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज पहाटे 3.30 वाजता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 2000 क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. सकाळी सात वाजता हा विसर्ग ९४१६ करण्यात आला आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून मुठा नदीत ९४१६ क्युसेक विसर्ग सोडल्याने शिवणे-नांदेड दरम्यानचा पूल पाण्याखाली जाणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे मार्केटमध्ये आंदोलन केले आहे. सरसकट खरेदी विक्रीसाठी आल्याचे लिलाव बंद पाडले. आले उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आले घेऊन मुंबईला जाणाऱ्या पिकअपची स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुर महामार्गावर कापूरहोळ परिसरात मोडतोड केली. वाहनाच्या काचा फोडल्या आणि वाहनाची हवाही सोडून दिली.
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार असल्याचं कळतंय. आज सकाळी ११ वाजता संसद भवनात बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते राहुल गांधींना त्यांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी खासगी सदस्यांचे विधेयक आणण्यास सांगण्याची शक्यता आहे.
गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूल अखेर आज पाण्याखाली गेला. गेल्या दोन दिवसांपासून पाणी पातळी कमी-अधिक होत होती. गडहिंग्लज-चंदगड मार्ग वाहतुकीस बंद झाल्याने चंदगडचा थेट संपर्क तुटला आहे. अन्य सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
इचलकरंजी : पंचगंगा नदीतील पुराचे पाणी नागरी वस्तीजवळ आले आहे. मंगळवारी सायंकाळी पाण्याची पातळी ६५ फुटांवर पोहोचली होती. ६८ फूट इशारा पातळी असून, त्या दिशेने पुराच्या पाण्याची वाटचाल सुरू आहे. इशारा पातळी गाठल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागणार आहे. विशेषतः लक्ष्मी दड्ड वसाहत, बागवान पट्टी, शेळके मळ्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यशोदा पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे कर्नाटक-हुपरी मार्ग बंद पडला आहे. इथे क्लिक करा
Latest Marathi Live Updates 24 july 2024 : केंद्र सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गाला प्राप्तिकरामध्ये सवलत देताना पुढील पाच वर्षांमध्ये रोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) रद्द करण्यास नकार देतानाच ही परीक्षा पुन्हा होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी स्पष्ट केलेय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. आज सर्वात जास्त कोयनानगरला १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे बेळगाव शहरासह बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर तालुक्यांतील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांसह अंगणवाडींना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. बिद्री कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.