
Amit Shah: केंद्रीय तपास एजन्सीजचा खरंच गैरवापर होतोय का? शहांनी स्पष्टचं सांगितलं
नवी दिल्ली : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) भारतातील दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी झाली आहे. बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीनंतर ही छापेमारी झाल्यानं पुन्हा एकदा केंद्रीय संस्थांचा गैरवापर होतोय, अशी चर्चा सुरु झाली आहे. या छापेमारीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलं आहे. (central investigation agencies being misused Amit Shah made it clear)
केंद्रीय तसाप एजन्सीजचा विरोधकांविरोधात गैरवापर होतोय का? असा प्रश्न शहा यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, जर विरोधकांची चौकशी होत असेल तर त्यात काहीतरी तथ्य असलेच. पण जर त्यांना या यंत्रणांचा गैरवापर होतोय असं वाटत असेल तर त्यांनी सरकारविरोधात कोर्टात जावं. जेव्हा पेगासिस प्रकरणावरुन विरोधकांनी असाच आरोप केला होता, तेव्हाही आम्ही त्यांना पुराव्यांसह कोर्टात जाण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी तसं केलं नाही, असंही शहा यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर भाजप गौतम अदानी यांच्या बाजूनं काम करतंय का? असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा शहा म्हणाले, यामध्ये काहीही लपून राहिलेलं नाही, त्यामुळं घाबरुन जाण्याचं कारण नाही. काँग्रेस, आप, भारतीय राष्ट्र समिती, राष्ट्रीय जनता दल तसेच जम्मू आणि काश्मीरमधील प्रादेशिक पक्ष यांच्यासह इतरही अनेक पक्षांनी भाजपवर आरोप केले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.