नवी दिल्ली - चिकुनगुनियाविरोधात तयार करण्यात आलेल्या लसीचा केवळ एक डोस संसर्गजन्य आजारांविरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे शरीरामध्ये तीव्र अशी प्रतिकारशक्ती तयार होते, असा दावा संशोधकांकडून करण्यात आला.
या प्रतिबंधात्मक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष ‘दि लान्सेट जर्नल’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. फ्रेंच बायोटेक कंपनी ‘वालनेव्हा’ने ‘व्हीएलए-१५५३’ ही लस तयार केली असून ही लस चिकुनगुनियानंतर मानवी शरीरामध्ये तयार होणाऱ्या इतर आजारांचा सामना कशा पद्धतीने करते? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
ज्या ठिकाणी चिकुनगुनिया हा एंडेमिक टप्प्यामध्ये पोचलेला नाही तिथे या लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या नसल्याने त्याबाबत आताच निष्कर्ष काढता येणार नाही असे संशोधकांकडून सांगण्यात आले. सध्या चिकुनगुनिया हा आजार आफ्रिका, आशिया हे खंड आणि अमेरिकेतील काही भागांमध्ये एंडेमिक स्थितीमध्ये पोचला असल्याचे दिसून आले आहे. या विषाणूची बाधा झालेल्या डासाने चावा घेतल्यानंतर साधारणपणे चार ते आठ दिवसांमध्ये रुग्णाला ताप येऊ लागतो.
डोकेदुखी अंगदुखी, मळमळणे आणि सांधेदुखी अशी लक्षणे त्याच्यामध्ये दिसू लागतात. अनेक रुग्णांमध्ये सांधेदुखी काही आठवड्यांपर्यंत राहू शकते. चिकुनगुनिया झाल्यानंतर रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते पण ज्येष्ठ नागरिक आणि नवजात अर्भकासाठी तो अधिक धोकादायक ठरू शकतो. या विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी सध्या तरी कोणतीही मान्यताप्राप्त लस बाजारात उपलब्ध नाही तसेच त्याविरोधात अँटीव्हायरल उपचार पद्धतीदेखील उपलब्ध नाही.
सध्या ज्या देशांमध्ये हा आजार एंडेमिक स्थितीमध्ये पोचला आहे तेथील नागरिकांना तसेच त्या प्रदेशात जाणाऱ्या नागरिकांना या नव्या लसीचा मोठा लाभ होऊ शकतो. अनेक ठिकाणांवर या आजाराचा संभाव्य उद्रेक देखील टाळता येईल.
- मार्टिना श्नेईदेर, क्लिनिकल स्ट्रॅटेजी मॅनेजर वालनेव्हा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.