नवी दिल्ली - कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांमध्ये हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांची आज भर पडली आहे. इतकेच नव्हे, कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर टीका करीत त्यांनी स्वपक्षावर "मार्ग चुकला' अशी टीकाही केली आहे.
हरियानातील रोहतक येथे एका जाहीर सभेत कलम 370 बाबतच्या निर्णयाचे उदाहरण देताना भूपिंदरसिंह हुडा म्हणाले की, केंद्र सरकारने काही चांगले निर्णय घेतल्यास त्याचे मी समर्थनच करेल. अनेक कॉंग्रेस नेते मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करीत आहेत. माझ्या पक्षाची दिशाच भरकटली आहे. कॉंग्रेस पूर्वीसारखी राहिलेली नाही. राष्ट्रभक्ती आणि आत्मसन्मान या मुद्द्यांवर कधीही तडजोड करू नये, असेही हुडा या वेळी म्हणाले.
कॉंग्रेसवर नाराजी व्यक्त करणाऱ्या हुडा यांनी राज्यातील भाजप सरकारवरही टीका केली. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने "कलम 370' मागे न लपता गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा अहवाल सादर करावा, अशी मागणी हुडा यांनी केली.
|