नवी दिल्ली ः एकीकडे भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) ४०० पार जाण्याची घोषणा देत असताना देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये ४०० च्या आत उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत काँग्रेसने ३०२ लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत.
काही महिन्यांपासून भाजपचे स्टार प्रचार व कार्यकर्ते लोकसभेत ४०० पारची घोषणा देत आहेत. काँग्रेसने मात्र यावर्षी सर्वात कमी जागांवर निवडणूक लढवून मित्रपक्षांना अधिक जागा देण्याची भूमिका घेतला आहे. त्यामुळे ४०० पेक्षा जागा लढविणाऱ्या काँग्रेस पक्ष आता केवळ ३२५ च्या आसपास जागा लढविणार आहे. काँग्रेस पहिल्यांदाच एवढ्या कमी जागा लढवीत आहे. या रणनीतीचा काँग्रेस पक्षाला काय फायदा होणार आहे, हे पाहावे लागेल.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४२१ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ ५२ उमेदवार निवडून आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अलीकडच्या काळात सर्वाधिक उमेदवार उभे केले होते. ही संख्या ४६४ एवढी होती. परंतु काँग्रेसला सर्वाधिक कमी ठिकाणी विजय मिळाला होता. यावेळी काँग्रेसला केवळ ४४ जागांवर खासदार निवडून आले होते. २००९ मध्ये काँग्रेसने ४४० जागा लढविल्या होत्या आणि २०६ ठिकाणी विजय मिळविला होता. तर २००४ मध्ये ४१७ जागांवर उमेदवार उभे करून १४५ जागांवर खासदार विजयी झाले होते. २०१४ नंतर काँग्रेसला लोकसभेत खासदारांची तीन अंकी संख्या निवडून आणता आले नाही.
काँग्रेसने कमी जागा लढून अधिक खासदार निवडून आणण्याचा संकल्प केल्याचा दावा आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसबरोबर आघाडी न केल्याने काँग्रेसच्या काही जागा वाढल्या अन्यथा हा आकडा ३०० पेक्षा खाली असता. काँग्रेसने आतापर्यंत बहुतेक उमेदवारांची घोषणा केली आहे. आता केवळ सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबच्या काही उमेदवारांची घोषणा करणे शिल्लक आहे. यात अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.