Rahul Gandhi News : सूरत कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या आधीही राहुल यांच्या विरोधात देशात १० हून अधिक मानहानीचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. मात्र राहुल गांधी यांनी कोणाही विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. (Rahul Gandhi and BJP, RsS Connection)
राहुल गांधी यांच्या विरोधात असलेल्या बहुतांश गुन्ह्यांचा संबंध भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. यातल्या काही प्रमुख गुन्ह्यांविषयी जाणून घ्या.
१. मोदी आडनावावरुन विधान करणं भोवलं
२०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरुन एक विधान केलं होतं. सगळ्या चोरांचं आडनाव मोदी असतं का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्याविरोधात गुजरात भाजपा नेते पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. यामध्ये राहुल गांधींना सूरत कोर्टाने नुकतीच दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आहे.
२. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेलं विधान
२०१४ साली महाराष्ट्रातल्या ठाण्यामध्ये एका सभेला संबोधित करत असताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसांनी महात्मा गांधींजींची हत्या केली होती. त्यांच्या या विधानाच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भिवंडी शाखेचे प्रमुख राजेश कुंती यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता.
या प्रकरणी राहुल गांधींचे वकील कुशल मोर यांनी सांगितलं की, या प्रकरणी अद्याप सुनावणी सुरू झालेली नाही. कारण याचिकाकर्ते अद्याप कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत.
यानंतर ऑगस्ट २०१६ मध्ये राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या एका अॅफिडेविटमध्ये सांगितलं होतं की, आपण कधीही महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरलेलं नाही. पण गांधी हत्येमध्ये या संघटनेनेच सदस्य सामील होते.
३. आरएसएस आणि भाजपाने आसामच्या मंदिरात जाण्यापासून रोखल्याचा दावा
२०१५ साली आसाममध्ये होणाऱ्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी दावा केला होता की त्यांना बाडपेटा इथल्या मंदिरात जाण्यापासून आरएसएसच्या लोकांनी अडवलं होतं. भाजपाच्या लोकांनी महिलांना पुढे केलं, जेणेकरून मी पुढे जाऊ शकणार नाही, असा दावा राहुल गांधींनी केला होता. त्यानंतर आरएसएस कार्यकर्ते अंजन बोरा यांनी राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.
४. गौरी लंकेश खूनप्रकरणी केलेल्या विधानाने आणलं अडचणीत
२०१७ मध्ये ज्यावेळी प्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती, त्यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये ते म्हणाले होते की, जे लोक भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेविरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाच प्रकारे दबाव टाकला जातो, मारहाण केली जाते, खूनही केला जातो. या विधानानंतर आरएसएस कार्यकर्ते आणि वकील धृतिमान जोशी आणि आदित्य मिश्राने मानहानीचा दावा दाखल केला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.