नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निवडीची काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक उद्या, गुरुवारी नवी दिल्लीत होत आहे. यात हरियाना, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांतील उमेदवारांच्या नावांवर विचार होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत जवळपास १०० ते १२५ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आघाडी नसलेल्या राज्यांमधील उमेदवार पहिल्यांदा निश्चित करण्याची काँग्रेसची रणनीती आहे. ‘इंडिया’ आघाडीतील केवळ समाजवादी पक्ष व आम आदमी पार्टीसोबतच काँग्रेसच्या जागावाटप निश्चित झाले आहे. घटकपक्षांसोबत निवडणूक लढवीत असलेल्या महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू व झारखंड या राज्यांमधील जागा वाटपांवर अद्यापही निर्णय झालेला नाही.
महाराष्ट्राची भूमिका मांडणार
महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. परंतु या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची भूमिका उद्या पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली जाणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात राजधानी दिल्लीत येत आहेत. यावेळी काँग्रेसची भूमिका ते पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली जाणार आहे.
राहुल व प्रियांका गांधींच्या नावांचे प्रस्ताव
काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या परंपरागत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव उत्तर प्रदेश काँग्रेस समितीने वरिष्ठांकडे पाठविला आहे. राहुल गांधी यांनी अमेठी तर प्रियांका गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव आहे. सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे या मतदारसंघातून प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.