लोकसभेचे पडघम! काँग्रेसमध्ये 'इन कमिंग' सुरू झाले..!

Congress NCP finalise seat sharing well ahead of Lok Sabha 2019
Congress NCP finalise seat sharing well ahead of Lok Sabha 2019

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना तीन जागा सोडण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे समजते. दरम्यान, लोकसभेचे पडघम वाजू लगताच काँग्रेस पक्षात अन्य पक्षातून नेत्यांचा आजपासून प्रवेश सुरू झाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसचे जागावाटप पूर्ण झाले असून मोजक्‍या जागांची अदलाबदल शिल्लक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरूवातीला पुण्याच्या जागेवर दावा केला होता. मात्र पक्षाचा हा दावा योग्य नसल्याचा खुलासा शरद पवार यांनी केल्यावर राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

दरम्यान, अन्य घटकपक्षांना सोबत घेण्याचा दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न आहे. हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेटी यांनी तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला सोडण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. भारिप बहुजन महासंघाचे ऍड. प्रकाश आंबेडकर आघाडीत दाखल झाल्यास त्यांच्यासाठी अकोला मतदारसंघ सोडण्यावर दोन्ही काँग्रेसचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले.

भाजप नेते काका कुडाळकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजप नेते काका कुडाळकर व मुंबईतील शिवसेना नेते सुभाष मयेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री नसीम खान, आमदार हुस्नबानो खलिफे, आमदार सुभाष चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस राजन भोसले, पृथ्वीराज साठे, गजानन देसाई, सचिव राजाराम देशमुख, शाह आलम आदी उपस्थित होते. 

यावेळी चव्हाण म्हणाले, ''काँग्रेस मुक्त भारताच्या वल्गना करणा-यांमध्ये लोकशाहीपेक्षा, जनतेपेक्षा आपण श्रेष्ठ अशी भावना निर्माण झाली होती. पाच राज्यांच्या निवडणुकीत जनतेने त्यांच्या अहंकाराला पराभूत करून धडा शिकवला आहे. भाजपचे जहाज आता बुडू लागले आहे यात शंका नाही.''

नागरिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला
देशातील 10 महत्त्वाच्या तपास यंत्रणांना कोणत्याही कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. हा नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रकार असून काँग्रेस याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

''सोहराबुद्दीन नावाची व्यक्ती या जगात अस्तित्वात होती का? जर ती व्यक्ती अस्तित्वात होती तर त्या व्यक्तीने स्वतःच स्वतःचा खून करून घेतला असावा. ''

'केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार सीबीआय, आयबी, एनआयए, नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरो, सक्तवसुली संचनालय, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍स, डायरेक्‍टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, रॉ, दिल्ली पोलीस आयुक्त, डायरेक्‍टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजन्स या दहा एजन्सी लक्ष ठेवणार आहेत. म्हणजे सरकार तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये सर्रासपणे डोकावणार आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल मोदी शाह देशभरात लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस या निर्णयाचा तीव्र विरोध करत असून सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा', अशी मागणी चव्हाण यांनी केली.

सोहराबुद्दीननं स्वत:च स्वत:चा खून केला असावा..!
चव्हाण म्हणाले, ''सोहराबुद्दीन नावाची व्यक्ती या जगात अस्तित्वात होती का? जर ती व्यक्ती अस्तित्वात होती तर त्या व्यक्तीने स्वतःच स्वतःचा खून करून घेतला असावा. मोदींच्या राज्यात अनेक व्यक्ती अचानक लुप्त होतात आणि पुढे भविष्यात अशा व्यक्तींची नावे दंतकथेत सामील होतात. ती माणसे अस्तित्वात होती की नाही, हे प्रश्न भविष्यात विचारले जातील आणि त्याचेही उत्तर मिळणार नाही. कारण त्याचेही सबळ पुरावे उपलब्ध नसतील, अशी तपास यंत्रणांची स्थिती आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com