काँग्रेसतर्फे उदयपूरमध्ये १३ ते १५ मे पर्यंत चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात काँग्रेसचे सुमारे ४०० नेते सहभागी होणार आहेत. यासाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. नियोजित कार्यक्रमावरून चिंतन शिबिरानंतर काँग्रेस हिंदुत्वाच्या वाटेवर येऊ शकते, असे मानले जात आहे. मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण केल्याच्या आरोपातून पक्ष बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे.
पुढील वर्षी राजस्थानमध्ये (rajasthan) निवडणुका होणार आहेत. यामुळे राजस्थानमध्ये राजकीय पारा चढला आहे. एकीकडे काँग्रेस उदयपूरमध्ये चिंतन शिबिर घेणार आहे तर भाजपही २० आणि २१ मे रोजी जयपूरमध्ये सभा घेणार आहे. इतकेच नाही तर गृहमंत्री अमित शहा मे महिन्यातच डुंगरपूर-बंसवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. हे दोन्ही जिल्हे दक्षिण राजस्थानमध्ये मोडतात. जिथे लक्षणीय आदिवासी लोकसंख्या आहे. काँग्रेसनेही येथे जास्त लक्ष केंद्रित केले आहे. अशोक गेहलोत यांनीही एप्रिलमध्ये येथे पोहोचून सरकारच्या अनेक योजनांचा प्रचार केला.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे चिंतन शिबिर होणार आहे. गुजरात, हिमाचलच्या निवडणुका आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या संघटनांच्या निवडणुकांबाबत चिंतन शिबिरात मंथन होणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय पुढील वर्षी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत या राज्यांसाठीही काँग्रेस रणनीती तयार करणार आहे.
राहुल व सोनिया गांधी बेनेश्वर धामला जाणार
राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी चिंतन शिबिरानंतर राजस्थानच्या बांसवाडा येथील बेनेश्वर धामला जाणार आहेत. जिथे ते सभेला संबोधित करणार आहेत. एवढेच नाही तर बेनेश्वर धामवर बांधलेल्या पुलाचे उद्घाटनही सोनिया गांधी करणार आहेत. बुधवारी राजस्थानचे आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुनसिंग बामनिया यांनी बेनेश्वर धाम येथे पोहोचून आढावा घेतला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गांधी परिवाराने बानेश्वर धामला भेट दिली होती. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही (narendra modi) येथे आले होते.
बेनेश्वर धाम हे राजस्थानचे प्रयागराज
बेनेश्वर धाम हे राजस्थानचे प्रयागराज म्हणून ओळखले जाते. याचे कारण येथे मही, सोम आणि जाखम नद्यांचा संगम आहे. येथे भगवान शिवाचे मंदिर आहे. त्याच्या जवळच भगवान विष्णूचे मंदिर देखील आहे. जे भगवान विष्णूचे अवतार मावजी यांनी येथे ध्यान केले त्याचवेळी बांधले गेले असे मानले जाते. दरवर्षी माघ महिन्यात येथे जत्रा भरते. ज्यामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरातमधील लोक मोठ्या संख्येने येतात. मान्यतेनुसार सुमारे तीनशे वर्षांपासून ही जत्रा भरते. येथे संत मावजी महाराज आणि बेनेश्वर यांच्या कथा सर्वत्र प्रचलित आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.