देशातील लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक;आरोग्य मंत्रालय- भारतीय लस अन्य देशांइतकीच प्रभावी

देशातील लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक;आरोग्य मंत्रालय- भारतीय लस अन्य देशांइतकीच प्रभावी

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना लसीकरण हे पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाचे असेल. भारतात जारी केली जाणारी लस ही अन्य देशांतील लशीइतकीच प्रभावी असेल, असे आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. याआधी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी ही लस घेणे श्रेयस्कर आहे कारण त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती आणखी वाढेल. सर्वसाधारणपणे कोरोनाच्या लशीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात असेही मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्‍नांना आज आरोग्य मंत्रालयाकडून उत्तरे देण्यात आली आहेत. 

प्रश्‍न- कोरोनावरील लस लवकर येईल की नाही? 
उत्तर- सध्या अनेक लशी या अखेरच्या टप्प्यात आहेत. भारत सरकार देखील लस बाजारात आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 

प्रश्‍न- सर्वांना एकाच वेळी ही लस देण्यात येईल का? 
उत्तर- लशीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्य गट निश्‍चित करण्यात आले आहेत. या गटांतील लोकांना लस आधी मिळेल कारण त्यांना सर्वाधिक धोका आहे. पहिल्या गटामध्ये आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्‍यक सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे दुसऱ्या गटात बहुव्याधी असलेल्या पन्नाशीच्या आतील लोकांचा समावेश असेल. 

प्रश्‍न- लशीचे डोस कसे देण्यात येतील? 
उत्तर- या लशीचे २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात येतील. 

प्रश्‍न- शरीरामध्ये अँटीबॉडीज कधी तयार होतील? 
उत्तर- लशीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर दोन आठवड्यांनी पुरेशा प्रमाणामध्ये अँटीबॉडीज तयार होतील. 

प्रश्‍न- भारतातील लस अन्य देशांप्रमाणेच प्रभावी असेल का? 
उत्तर- होय, ती तितकीच प्रभावी असेल. 

प्रश्‍न- कोरोना लसीकरण अनिवार्य असेल का? 
उत्तर- लस घेणे पूर्णपणे ऐच्छिक आहे पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी डोस घ्यावी. 

प्रश्‍न- ही लस पूर्णपणे सुरक्षित असेल का ? 
उत्तर- नियामक यंत्रणेने मान्यता दिल्यानंतरच लस बाजारात आणली जाणार असल्याने ती सुरक्षित आहे. 

प्रश्‍न- लसीकरणासाठी कोणत्या लशीची निवड केली जाईल ? 
उत्तर- नियामक यंत्रणा चाचण्यांच्या डेटाचा अभ्यास करत आहेत. ज्यांना परवानगी मिळेल ती लस प्रभावीच असेल. या लशीच्या प्रभावासाठी तिची घेणाऱ्यांनीही तिची साखळी पूर्ण करायला हवी. लोकांना वेगवेगळ्या लशी दिल्या जाऊ शकत नाहीत. 

प्रश्‍न- नोंदणीशिवाय लस मिळेल का? 
उत्तर- नाही. लस घेण्यासाठी नोंदणी आवश्‍यक असून त्यानंतर लसीकरणाची वेळ आणि जागा सांगण्यात येईल. 

प्रश्‍न- लसीकरणाची माहिती कशी मिळेल? 
उत्तर- ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला मेसेज पाठवून माहिती देण्यात येईल. 

प्रश्‍न- लस मिळावी म्हणून नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्‍यक आहेत? 
उत्तर- चालक परवाना, आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, संसद अथवा विधिमंडळाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक अथवा पोस्टाचे पासबुक, पासपोर्ट, पेन्शनची कागदपत्रे, मतदान ओळखपत्र, सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा सर्व्हिस आयडी यापैकी कोणतेही एक ओळखपत्र चालेल. 

प्रश्‍न- लसीकरण केंद्रावर काय करावे लागेल? 
उत्तर- लस घेतल्यानंतर अर्धा तास तिथेच थांबावे लागेल. लस घेणाऱ्यास त्रास झाल्यास त्याने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्‍यक आहे. 

प्रश्‍न- कोरोना रुग्णाला लस देण्यात येईल का ? 
उत्तर- अशा व्यक्ती केंद्रावर आल्याने संसर्ग वाढू शकतो ही भीती लक्षात घेऊन संबंधित रुग्णातील लक्षणे संपुष्टात आल्यानंतर १४ दिवसांनी त्याला लस देण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com