कोरोनाला आटोक्यात आणल्यानंतर आता केरळची परिस्थिती हाताबाहेर का?

pinrayi vijayan
pinrayi vijayan

तिरुवनंतपुरम - कोरोना विषाणूचा उद्रेक चीनच्या वुहान शहरात मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात सुरवातीला झाला होता. व त्यानंतर या विषाणूने यूरोपीय देशांमध्ये मोठाच हाहाकार उडवून दिला. तर मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोना संसर्ग झालेला पहिला रुग्ण भारतातील केरळ मध्ये आढळला होता. मात्र त्यानंतर देशाच्या सर्वच भागांमध्ये या विषाणूने पाय पसरण्यास सुरवात केली. सुरवातीला या महामारीच्या प्रसाराला रोखण्यात केरळ राज्य यशस्वी ठरले होते. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून केरळ मध्ये कोरोनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. केरळ राज्यात काल एकाच दिवसात आत्तापर्यंत सर्वाधिक 2,000 हून अधिक कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 50,000 वर गेली आहे. 

देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असताना, केरळ राज्याने मधल्या काही काळात या विषाणूच्या प्रसाराला यशस्वीरीत्या आळा घातला  होता. पण आता या राज्यातील परिस्थिती देखील बिघडत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील एकाच महिन्यात केरळ मध्ये कोरोना संक्रमित झालेल्या प्रकरणांची संख्या जवळजवळ चार पटीने वाढली आहे. आणि हा वाढीचा दर देशात सर्वाधिक राहिला आहे. आणि सध्याच्या स्थितीला देखील केरळ मध्ये 4.01 च्या सरासरीने कोरोनाचे रुग्ण वाढत असून, हा रुग्ण वाढीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. केरळ व्यतिरिक्त फक्त पंजाबमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून केरळ राज्यातील मृत्यूचा आकडा देखील वाढला आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा केरळ मध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी, यामध्ये गेल्या काही दिवसात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत 225 जणांचा मृत्यू केरळ मध्ये झाला आहे. यातील 43  जणांचा मृत्यू इतर कारणामुळे झाला असल्याचे राज्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची गणना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आकडेवारीत करण्यात येणार नसल्याचे केरळ ने म्हटले आहे. 

देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउनसह प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर जून महिन्याच्या सुरवातीपासून लॉकडाउनचे नियम टप्याटप्याने शिथिल करण्यात आले. त्यामुळे मे महिन्यात प्रवासावरील निर्बंध देखील कमी झाल्यावर केरळमधील कोरोनाची प्रकरणे वाढू लागली होती. याव्यतिरिक्त बहुतेक नवीन प्रकरणे ही इतर राज्यांमधून किंवा परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे वाढत चालल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळपास दीड दशलक्ष हून अधिक लोक केरळमध्ये परतल्याचा अंदाज आहे. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये देखील या विषाणूचे संक्रमण होऊन, सामूहिक संसर्ग सुरु झाला असल्याचे केरळने मान्य केले आहे. केरळ हे कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग सुरु झाला असल्याचे मान्य करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

दरम्यान, भारतात आत्तापर्यंत 28 लाख 36 हजार 925 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, 53 हजार 866 जणांचा जीव गेला आहे. तर संपूर्ण जगभरात आत्तापर्यंत 2,24,42,243 नागरिकांना  कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आणि 7 लाख 88 हजार 356 जणांचा मृत्यू झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com