भारताची कोरोना लस कधी आणि कोणाला मिळणार? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

harsh vardhan
harsh vardhan

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गावर आयसीएमआर व भारत बायोटेक यांनी मिळून बनविलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचणीचे परिणाम समाधानकारक आले असून या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ही लस देशवासीयांना उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज व्यक्त केला. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली लसही २०२० अखेरपर्यंत बाजारात येऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला कोरोनाची लस किती प्रमाणात मिळावी याचे काही ठळक निकष तयार केले असून त्यामध्ये लोकसंख्या व महामारीचा संसर्ग तसेच प्राधान्यक्रम यांचा विचार करण्यात येईल अशी माहिती या संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेबरायसूस यांनी दिली आहे. संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात पीपीआर किट व अन्य बाबींची काही देशांनी साठेबाजी करत नफेखोरी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि लसीचा पुरवठा करण्याबाबत आरोग्य संघटनेच्या अटी पाहता भारताचा त्यावर पहिल्या टप्प्यातच मोठा दावा असेल एवढे मात्र नक्की. 

कालावधी कमी करण्यावर भर 
डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, ‘‘ जगभरात अनेक देशांत कोरोना लसीच्या चाचण्या वेगाने सुरू असून त्यातील अनेक चाचण्या अंतिम टप्प्यात पोचल्या आहेत. भारतात तयार होणाऱ्या तिन्ही लसींच्या चाचण्या याच वर्षाअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सीरम इन्स्टिट्यूट व ऑक्सफर्ड विद्यापीठाची लसही कमीत कमी कालावधीत लोकांना उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसारच कोरोना लसी देशवासीयांना उपलब्ध करून दिल्या जातील. मात्र त्यांचा कालावधी कमीत कमी असावा असे सरकारचे प्रयत्न आहेत.’’ 

या तीन लसी अंतिम टप्प्यात 
ऑक्‍सफर्ड - सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने तयार होणारी. 
कोव्हॅक्सिन : हैदराबादची भारत बायोटेक व आयसीएमआरच्या सहकार्यातून तयार होणारी लस 
जायकोव्ह-डी : जायडस कॅडिलाच्या लसीचीही मानवी चाचणी सुरू. 

लस देत असताना प्राधान्य कोणाला?
आम्ही या वर्षअखेरचे लक्ष्य डोळ्यासमोर समोर ठेवले आहे. लस रास्त दरात उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रातर्फे संबंधित कंपन्यांशी सामंजस्य करारही करण्यात येणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व कोरोना योद्धे यांना सर्वांत आधी लसीकरण करणे आवश्यक आहे. याशिवाय ६५ च्या पुढील वयोगटातील नागरिक व दाट लोकवस्तीच्या जागांतील लोकांनाही प्राधान्याने कोरोना लसीकरण व्हायला हवे, असे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com