नवी दिल्ली : ‘एमएसपी’ची मागणी रेटण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या इशाऱ्यामुळे दिल्लीतून इतर राज्यांमध्ये जाणारे सर्व राज्यांच्या सीमांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील आंतरराज्य बस स्थानकांवरही बंदोबस्त वाढविला आहे.
पंजाब व हरियानाच्या सीमांवर शेतकऱ्यांना पोलिसांनी अडविले. शेतकरी संघटनांनी ६ मार्चला दिल्लीतील जंतरमंतवर आंदोलन करण्याचे जाहीर केले होतें.परंतु पोलिसांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये, यासाठी दिल्लीच्या सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर व गाझीपूर सीमांवर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.
एवढेच नव्हे तर हरियाना पोलिसांनी मार्ग अडविल्यामुळे इतर राज्यातील शेतकऱ्यांनी रेल्वे किंवा बसद्वारे दिल्लीत पोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे अनेक शेतकरी रेल्वे व बसने दिल्लीत पोचत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे आंदोलन अधिक तीव्र करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आतापर्यंत ३० शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध केले आहे. याशिवाय दिल्लीत येणाऱ्या नेत्यांना सीमेवर किंवा दिल्लीत आल्यास लगेच स्थानबद्ध केले जाईल, असा इशारा दिला आहे.