सिल्चर ः आसाममधील सैदपूर येथील अंजली रॉय यांना भारतीय नागरिकत्व देणाऱ्या लवादाने २०१५मध्येच भारताचे नागरिकत्व देऊनही मतदार यादीमध्ये त्यांच्या नावापुढे ‘डी’(डाउटफूल) अर्थात संशयित असा २०१२मध्ये लागलेला शेरा अद्यापही पुसला न गेल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. अशीच परिस्थिती चैलटाकांडी या गावातील बानेसा बेगम यांची आणि अन्य हजारो जणांची आहे. बानेसा बेगम यांच्या सर्व कुटुंबीयांची नेवे राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत आहेत त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार आहे मात्र बानेसा यांच्या नावापुढे ‘डी’ असल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे.
बांगलादेशातून विस्थापित झालेला हिंदू बंगाली नागरिकांनी आसाममधील सिल्चर आणि करीमगंज या बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेला जिल्ह्यांत आश्रय घेतला आहे. दरम्यान या नागरिकांच्या नारिकत्वाविषयी आणि त्यांच्या नावापुढील ‘डी’ या शेऱ्याबाबत मागील कित्येक वर्षे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आश्वासने दिली असूनही यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.
काय आहे ‘डी’ शेरा
आसामध्ये ९६ हजार ९८७ ‘डी’ शेरा असलेले नागरिक आहेत. ज्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत संदिग्धता आहे, अशा नागरिकांच्या मतदार यादीमधील नावापुढे ‘डी’ अर्थात डाऊटफूल असा शेरा १९९७मध्ये निवडणूक आयोगाकडून देण्यात आला असून त्यांना मतदानापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी मतदानानंतर अवघ्या सहा महिन्यांत हा मुद्दा निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे तर, काँग्रेसचे उमेदवार हाफीज अहमद रशिद चौधरी यांनी दावा केला आहे की, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सरकारला नसून निवडणूक आयोगाला असल्याने निवडणूक आयोगानेच याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.