
नाशिक : श्रीलंकेत सद्यस्थितीत परकीय चलन डॉलरच्या कमतरतेमुळे आर्थिक अडचणींमध्ये भर पडली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कांदा निर्यातदारांचे पैसे वेळेत मिळण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आता भारतीय निर्यातदारांचे १२० कोटी अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर श्रीलंकेतील आर्थिक स्थिती न सुधारल्यास लाल कांद्याच्या श्रीलंकेतील निर्यातीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतील अन्नधान्याचे ८०० कंटेनरही या परिस्थितीमुळे अडकलेत.
अन्न आयातदार संघटनेने काही दिवसांपूर्वी अन्नधान्याचे बंदरात अडकलेले कंटेनर सोडवण्यात न आल्यास श्रीलंकेत अन्नपदार्थांच्या कमतरेचा धोका उत्पन्न होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट असोसिएशनने भारतीय निर्यातदारांच्या अडकलेल्या पैशांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर निर्यातदारांनी अडकलेले पैसे नेमके कधी मिळतील याची माहिती घेण्यासाठी श्रीलंकेत जाणे पसंत केले होते. त्यात प्रामुख्याने कांदा निर्यातदार होते. हे निर्यातदार मायदेशी परतले आहेत. त्यांच्याकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. एक आठवड्यात श्रीलंकेत २०० कंटेनरमधून सर्वसाधारपणे ५ हजार टन कांदा भारतातून पाठवला जातो. एका टनाचा भाव तीस हजार रुपये असून, निर्यात झालेल्या कांद्याचा विचार केल्यास अडकलेल्या पैशांची नेमक्यापणाने कल्पना येण्यास मदत होते, असे निर्यातदारांनी सांगितले. श्रीलंकेतील पर्यटनावर कोरोनामुळे विपरित परिणाम झालेला असताना श्रीलंकेच्या चहा निर्यातीला फटका बसला आहे. परिणामी, परकीय चलन डॉलरची गंभीर समस्या श्रीलंकेत तयार झाल्याचे भारतीय कांदा निर्यातदारांना आढळले आहे. लसूण आणि आले चीनमधून श्रीलंकेत येत असले, तरीही आटा, डाळी, मीठ, मैदा, साखर, कांदा, ज्वारी अशा दैनंदिन गरजेच्या बाबींवर श्रीलंकेला भारतावर अवलंबून राहावे लागते. पर्यटनात सुधारणा झाल्यास श्रीलंकेचा आर्थिक गाडा रुळावर येण्यास सुरवात होईल, अशी परिस्थिती श्रीलंकेत पाहिल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
कांदा निर्यात थांबलीय
श्रीलंकन सरकारने कांद्याच्या आयातीवर ४० रुपये किलो असे आयात शुल्क लागू केल्याने कांद्याची निर्यात भारतातून थांबल्यात जमा आहे. श्रीलंकेतील स्थानिक कांदा बाजारात विक्रीसाठी येत असून, अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर कांदा १०५ रुपये किलो भावाने विकला जात आहे. श्रीलंकेतील शेतकऱ्यांचा कांदा तेथील ग्राहकांना आणखी दोन महिने पुरवठा होऊ शकेल. मात्र, त्यानंतर श्रीलंकेतील ग्राहकांना भारतीय कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, मागील थकलेले पैसे मिळाले नाहीत, तर लाल कांदा पाठवण्यास निर्यातदार कितपत धजावतील हा खरा प्रश्न आहे. ‘बँक गॅरंटी’ची समस्या श्रीलंकेत बिकट बनल्याने बऱ्याच भारतीय निर्यातदारांनी उधारीवर माल दिलेला आहे. अशा निर्यातदारांचे डोळे श्रीलंकेतून पैसे मिळण्याकडे लागलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.