‘वायनाड’वरून वादाची ठिणगी!

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघावरून काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये (भाकप) वाद निर्माण झाला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघावरून काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये (भाकप) वाद निर्माण झाला आहे. भाकपने चार मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून ॲनी राजा हे वायनाडमधून लढणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर या मतदारसंघाचा घेतलेला राजकीय आढावा.

केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी चार मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. ॲनी राजा हे वायनाडमधून लढणार आहेत. ज्येष्ठ नेते पी. रवींद्रन हे तिरुअनंतपुरममधून लढतील. सध्या काँग्रेसचे नेते शशी थरूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

भाकपचे सरचिटणीस बिनॉय विश्वम यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केल्याने हा वाद लवकर निवळणार असे वाटत नाही. जिल्हा पातळीवरील संघटनांच्या शिफारशीला अनुसरून या उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्याचे सांगत सध्या राज्यात आमच्या आघाडीला अनुकूल वातावरण असून भविष्यात आमचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास डाव्या आघाडीतील नेते व्यक्त करतात. यावरून सध्या तरी त्यांनी काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे, असे म्हणावे लागेल.

प्रत्येक पक्षाला मतदारसंघावर दावा करण्याचा अधिकार आहे. पण इतर राज्यात मित्र आणि एका राज्यात विरोधक हे जरा न पटणारे आहे. शिवाय वायनाडचा आत्तापर्यंतच्या निवडणुकांचा आढावा घेतला तर काँग्रेस पक्षाने येथे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ‘इंडिया’ आघाडीत जर डावे पक्ष आहेत, तर नैसर्गिक न्यायानुसार वायनाड मतदारसंघ काँग्रेसला सोडणे सयुक्तिक ठरेल. कारण राहुल गांधी यांच्यासारखा नेता या मतदारसंघाचे सध्या प्रतिनिधित्व करीत आहे. शिवाय मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून येथे काँग्रेसनेच विजय मिळविलेला आहे.

२००९ मध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. यात सात विधानसभा मतदारसंघ येतात. २०१९ नुसार येथे १३ लाख ५७ हजार ८१९ मतदार आहेत. या लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी तीन काँग्रेसकडे, ‘सीपीआयएम’कडे दोन व ‘आययुएमएल’ तसेच डावी लोकशाही आघाडीकडे (एलडीएफ) प्रत्येकी एक आमदार आहेत. एक मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी व दोन मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. सुरुवातीपासून म्हणजे मागील तीन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला आहे.

मतांची आकडेवारी काय सांगते?

१) २०१९ मध्ये ८०.३३ टक्के मतदान झाले होते. यातील विजयी राहुल गांधी यांना सात लाख, सहा हजार ३६७ (६४.६४ टक्के) मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरील ‘सीपीआय’चे पी. पी. सुन्नर यांना दोन लाख ७४ हजार ५९७ (२५.१३ टक्के) मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील भारत धर्म जन सेनाचे तुषार वेल्लापल्ली यांना अवघी ७८ हजार ८१६ (७.२१ टक्के) मते मिळाली. एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. राहुल गांधी यांचा चार लाख ३१ हजार ७७० मतांनी विजय झाला होता.

२) लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला तीन लाख ७७ हजार ०३५ मते (३०.१८ टक्के) व ‘सीपीआय’ला तीन लाख ५६ हजार १६५ मते (२८.५१ टक्के) मिळाली होती. २००९ मध्येही येथून काँग्रेसचे एम. आय. शनवास (४,१०.७०३ मते, ३७.२७ टक्के) यांनी ‘सीपीआय’चे ॲड. एम. रामथुल्ला यांचा (२,५७,२६४, २३.३४ टक्के) पराभव केला होता. यावरून या मतदारासंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे हे सिद्ध होते.

३) लोकसभेच्या २००९ मध्येही झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे एम. आय. शनवास (४,१०,७०३, ३७.२७ टक्के) मते मिळवून विजयी झाले. ‘सीपीआय’चे एम. महामुथ्थुला हे (२,५७,२६४ मते, २३.३४ टक्के) पराभूत झाले होते.

कोण काय म्हणतात?

राहुल गांधी यांनी कोठून लढायचे किंवा त्यांना कोठून लढवायचे हा काँग्रेसचा प्रश्‍न आहे, अशा शब्दांत वृंदा करात यांनी काँग्रेसला सुनावले असून याला उत्तर देताना राहुल गांधी कोठूनही निवडणूक लढवून जिंकू शकतात, असे वक्तव्य काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केले आहे. अर्थात हे विधान अतिआत्मविश्‍वास दाखविणारे वाटते.

माध्यमे सांगतात तशी केरळमध्ये आमच्या आघाडीविरोधात कोणतीही लाट नाही. लोकांचा कल हा डाव्या आघाडीच्या बाजूनेच आहे. स्थानिक निवडणुकांतून नेमकी हीच बाब उघड झाली होती, असा दावा ‘भाकप’चे सरचिटणीस बिनॉय विश्वम यांनी केला.

या संधीचा फायदा उठवत पंतप्रधानांनीही काँग्रेस व डाव्यांवर टीका केली आहे. ‘केरळमध्ये शत्रू, अन्यत्र मित्र’, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी दोन्ही पक्षांचा समाचार घेतला. सध्या हे दोन्ही पक्ष केंद्रीय पातळीवर भाजपला इंडिया आघाडीच्या माध्यमातून नवा पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत.

मात्र वायनाडवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाले आहेत. केरळमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे परस्परांचे विरोधक असून अन्य राज्यांमध्ये मात्र ते परस्परांचे जिवलग मित्र आहेत. पी. विजयन हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करतात. त्यांच्यावर फॅसिस्ट असल्याचा ठपका त्यांनीच ठेवला आहे.

डाव्यांच्या राजवटीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. केरळच्या बाहेर मात्र दोन्ही पक्षांची मंडळी एकत्र बसून सामोसा, चहा आणि बिस्किटांवर ताव मारत चर्चा करतात, अशी बोचरी टीका मोदी यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com