
नवी दिल्ली : देश- परदेशातील गांधी विचारांच्या अभ्यासकांसाठी गेली वर्षानुवर्षे महत्त्वाचा आधार असलेल्या राजधानी दिल्लीतील जागतिक लौकिक असलेल्या ‘गांधी शांती प्रतिष्ठान’(जीपीएफ) या बिगर सरकारी संस्थेवर मोठे आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. या संस्थेचा गाडा चालविण्यासाठी वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयांची आवश्यकता असताना ती रक्कम जमविणेही प्रतिष्ठानला कठीण होऊन बसले आहे.
महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या या महात्म्याला वंदन करण्यासाठी येणाऱ्या देशभरातील राजकीय पक्ष व नेत्यांचे लक्ष या ‘प्रतिष्ठान’च्या आर्थिक विपत्तीकडे जाईल काय? असा सवाल गांधी विचारांच्या अभ्यासकांकडून केला जात आहे.
दरम्यान सरकारी मदतीवर न चालणाऱ्या अत्यंत विरळ गांधीवादी संस्थांमधील एक असलेल्या या संस्थेच्या सध्याच्या कारभाऱ्यांनी सत्तेवर असणाऱ्या विचारांविरूद्ध घेतलेली भूमिका हेही या संस्थेला मदत न मिळण्यामागचे कारण असू शकते असे बोलले जाते. ‘‘अर्थात अजूनही माणसातील चांगुलपणावर व सत्य, अहिंसा या मूल्यांवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास कायम असल्याने महात्मा गांधी व त्यांच्या विचारांनी चालणाऱ्या संस्थांचे महत्त्व काय राहील.’’ असा आशावाद संस्थेचे पदाधिकारी व्यक्त करतात. ‘‘ आगामी दिवस देशासाठी फार कठीण असतील. गांधीविरोधी विचार पसरविण्याचे काम सुरू आहे. असत्य ते सत्य माना या प्रकारच्या दडपशाहीचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा गांधी विचाराच्या माध्यमातून प्रतिकार केला पाहिजे.’’ असेही प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार प्रशांत यांनी सांगितले.
संस्थेचे ठिकाण
दिल्लीतील मध्यवर्ती व २०१५ नंतर वर्दळीच्या बनलेल्या ‘राऊज ॲव्हेन्यू’ म्हणजेच दीनदयाळ उपाध्याय मार्गावर ‘जीपीएफ’चे मुख्यालय असलेला मोठा परिसर आहे. याच रस्त्यावर पुढे जाऊन जगातील सर्वांत मोठ्या पक्षाचे म्हणजे भाजपचे राष्ट्रीय मुख्यालय आहे, त्याच रस्त्यावर कॉंग्रेसचेही मुख्यालय होऊ घातले आहे. या रस्त्यावरून बड्या नेत्यांची नेहमीच ये-जा असते पण संस्थेकडे फार क्वचित लोकांचे लक्ष जाते.
अनेक केंद्रेही बंद
तरुण पिढीने महात्मा गांधींबाबत अभ्यास करावा, त्यांना गांधीविचार समजावा म्हणून ‘जीपीएफ’ ही संस्था सातत्याने प्रयत्न करत असते. या संस्थेची देशभरातील किमान १६० केंद्रे बंद झाली आहेत. या संस्थेच्या किमान ३५ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाचाही प्रश्न डोके वर काढत आहे. मला गेल्या पंधरा वर्षांत १० हजार रुपयांपेक्षा अधिक पगार मिळालेला आठवत नाही. आता तर फारच कठीण स्थिती आहे असे एका जुन्या कर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
दानशूरांच्या देणग्याच आधार
दरवर्षी गांधीजींचे विचार व लेखन यावर संस्था अनेक कार्यक्रम आयोजित करते. कोरोना काळात त्यावरही निर्बंध आले आहेत. संस्थेच्या ग्रंथालयाची परिस्थितीही नाजूक म्हणावी अशी आहे. सध्या शासकीय मदतीबाबत आम्हाला फारशी आशा नाही व मागील सरकारांनीही संस्थेला मदत केली नाही, अशी खंत येथील कर्मचारी व्यक्त करतात. दानशूरांकडून मिळालेल्या देणग्यांवरच मुख्यत्वे या संस्थेचा कारभार चालतो.
कोरोनामुळे संस्थेचा देणग्यांचा ओघ आटला आहे. गांधीजींनी लाखो माणसांचे आयुष्य बदलून टाकले, तीच ताकद त्यांच्या लेखनात आहे. त्यामुळेच आजही तरुण पिढीत गांधी नावाबद्दल एक वेगळेच कुतूहल कायम आहे हे वारंवार जाणवते.
- कुमार प्रशांत, अध्यक्ष ‘जीपीएफ’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.