चंडीगड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना सर्वाधिक विरोध केलेल्या हरियाना-पंजाब या उत्तरेमधील राज्यांनी आता अग्निपथ योजनेबाबतही असाच पवित्रा घेतला आहे. या योजनेसाठी अर्ज केल्यास समाजात एकटे पाडले जाईल, असा इशारा खाप जमातीच्या पंचायतींनी दिला आहे. खाप, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या संघटनांच्या नेत्यांची रोहतक जिल्ह्यातील सांपला गावात बैठक झाली. या बैठकीला हिमाचल प्रदेश आणि राजस्थान येथील विविध जातींच्या पंचायतींचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यात ही भूमिका ठरविण्यात आली. धनकर खाप पंचायतीचे प्रमुख ओमप्रकाश धनकर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
सत्ताधारी भाजप-जेजेपी (जननायक जनता पक्ष) युतीचे राजकीय नेते तसेच या योजनेला पाठिंबा दिलेल्या उद्योगसमूहांवर बहिष्कार घालण्यात येईल. अशा कंपन्यांचे दहा हजारपेक्षा जास्त मूल्य असलेले कोणतेही उत्पादन खरेदी करू नये असे आवाहन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.प्रेषित महम्मद पैगंबर यांचा भाजपच्या काही नेत्यांनी अवमान केल्याप्रकरणी आखातामधील काही देशांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घातल्याचे वृत्त आहे. हा संदर्भ धनकर यांनी दिला. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांच्या विरोधात तळ ठोकला होता. त्याच धर्तीवर सांपला येथील छोटूराम धाम येथे कायमस्वरूपी आंदोलन केले जाईल. त्यात विविध राज्यांमधील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन धनकर यांनी केले. आधी आंदोलन केलेल्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.
अग्नीवीरच्या नावाखाली तरुणांना कामगार म्हणून भाड्याने घेण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. आम्ही बहिष्कार हा शब्द वापरत नाही, मात्र अशा लोकांपासून जातीबांधव अंतर राखतील.
- ओमप्रकाश धनकर, धनकर खाप पंचायतीचे प्रमुख
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.