महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मुसळधार पाऊस

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मुसळधार पाऊस

पाटणा : बिहारमध्ये गेल्या चोवीस तासांत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गयाच्या शेरघाटीत भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 155 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वेधशाळेने आगामी दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे पाटण्यातील सखल भागात पाणी जमा झाले आहे. राजेंद्रनगर भागात एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. पाटण्यातील बहुतांश भागात पाणी साचले आहे. 

पाटण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे आज शाळा बंद होत्या. अनेक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. किमान पाच रेल्वे रद्द करण्यात आले, तर अन्य पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. बदललेल्या वेळापत्रकात लोकल आणि झारखंडकडे जाणाऱ्या रेल्वेचा समावेश आहे. शाळा आणि कॉलेज परिसर, रुग्णालयात पाणी शिरले आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

पाटणा, भागलपूर, मुझफ्फरपूर आणि गया येथे एनडीआरएफच्या पथकांना तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. सततच्या पावसाने नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. राज्यातील चौदा जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, सर्वच 38 जिल्ह्यांतील स्थितीही पावसाने ढासळली आहे. नवरात्रोत्सवाच्या तयारीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com