इंटरनेट सेवा बंद; श्रीनगरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू
जम्मू - सुरक्षा दलांनी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमधील टू- जी इंटरनेट सेवा आज पुन्हा बंद केली, अफवा आणि फेक न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. साधारणपणे दुपारनंतर पोलिसांनी दूरसंचार कंपन्यांना ही सेवा रोखण्याचे आदेश दिले होते.
राज्यामध्ये अफवा पसरू नयेत आणि शांतता कायम राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे शनिवारच्या हिंसाचाराच्या घटनानंतर श्रीनगरमधील काही भागांत पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
तत्पूर्वी शनिवारी जम्मू, सांबा, कथुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. तसेच काही भागांतील संचारबंदीही शिथिल करण्यात आली होती. हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेलेली यात्रेकरूंची पहिली तुकडी आज काश्मीरमध्ये दाखल झाली असतानाही निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणांवर आंदोलन झाल्याचे वृत्त असून, यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याचेही समजते. जखमींचा नेमका आकडा मात्र समजू शकलेला नाही.
|