नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या माफीनाम्यावरून सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यातील संघर्ष चिघळला. राहुल हे देशविरोधी टूलकिटचा भाग असल्याचा घणाघाती आरोप करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या माफीनाम्याची मागणी केली. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, ‘माफीचा प्रश्न उद्भवत नाही,‘ असे सत्ताधाऱ्यांना बजावले असून ज्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही ते खरे राष्ट्रविरोधी असल्याचा उलटवारही केला.
राहुल यांनी ब्रिटनमध्ये भारताचा आणि संसदेचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी भाजप आक्रमक आहे. या गदारोळामुळे संसदेच्या दोन्हीही सभागृहांमध्ये आठवड्यात काहीही कामकाज होऊ शकलेले नाही.
याच मालिकेत नड्डा यांनी व्हिडिओ जारी केला. ‘देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात आणि मोठे संकट असतानाही कोणत्याही भारतीय नेत्याने आतापर्यंत परदेशी शक्तींकडे भारत सरकारविरुद्ध कारवाईची मागणी केली नव्हती.
काँग्रेस पक्ष देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याची बाब अतिशय दुर्दैवी आहे. देशवासीयांनी सतत नाकारल्यानंतर आता राहुल देशविरोधी टूलकिटचा हिस्सा बनले आहे. एकीकडे देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून जी-२०च्या बैठका होत असताना राहुल परदेशात जाऊन भारताचा आणि संसदेचा अपमान करत आहेत.
१३० कोटी लोकांनी निवडलेल्या सरकारचा राहुल गांधी अपमान करत आहेत. भारतात लोकशाही संपली असून युरोप, अमेरिकेने हस्तक्षेप करावा असे परदेशात जाऊन राहुल म्हणतात यापेक्षा लाजीरवाणे काहीही असू शकत नाही, असे नड्डा यांनी म्हटले आहे.
अशी मागणी करण्यामागचा नेमका काय हेतू आहे, अमेरिकी उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि राहुल एकच भाषा का बोलतात, पाकिस्तान आणि काँग्रेस यांचे बोलणे एकसारखे का असते, असे सवालही नड्डा यांनी केले आहेत.
नड्डा यांच्या टीकेने संतप्त झालेल्या खर्गे यांनी खरमरीत भाषेत ट्विट करून प्रत्युत्तर दिले. ‘बेरोजगारी, महागाई आणि परममित्राच्या गैरव्यवहारांवरून लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी भाजपकडून हा प्रकार सुरू आहे,‘ असा प्रत्यारोप त्यांनी केला. राहुल यांची पाठराखण करताना खर्गे यांनी म्हटले आहे की, की लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करणारा व्यक्ती राष्ट्रविरोधी असूच शकत नाही. तो खरा देशभक्त आहे. संसदेत राहुलना बोलण्याची संधी मिळाल्यास भाजपच्या आरोपांचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही खर्गे यांनी दिला.
आम्ही कोणते पाप केले ज्यामुळे आमचा भारतात जन्म झाला, असे खुद्द पंतप्रधान मोदी सहा-सात देशांमध्ये जाऊन बोलले होते आणि असे लोक आम्हाला राष्ट्रविरोधी म्हणत आहेत. मोदींनीच भारताच्या नागरिकांचा अपमान केला असल्याने त्यांनी माफी मागायला हवी. आम्ही माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे अध्यक्ष
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.