
जम्मू : जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यात 62 अतिरेकी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 2021 वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात 37 अतिरेकी मारले गेले होते, त्या तुलनेत यावर्षीच्या आकडा वाढला असल्याचं पोलिसांच्या माहिती अहवालातून समोर आलं आहे.
(62 Terrorist Killed In kashmir Last 4 Month)
जम्मू काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या 62 अतिरेक्यांपैकी 15 अतिरेकी हे परदेशी असल्याचं समोर आलं असून पाकिस्तानचे रहिवाशी असल्याचं पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे सांगितलं आहे. दरम्यान मागच्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यात एकाही परदेशी अतिरेक्याला मारलं गेलं नव्हतं. 2021 वर्षात जवळपास 168 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यापैकी 20 परदेशी अतिरेकी होते.
भारतीय गुप्तचर संघटना आयबी, रॉ आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त माहितीच्या आधारे ही आकडेवारी पोलिसांनी जाहीर केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत अतिरेक्यांची संख्या वाढणे म्हणजे सीमेपलीकडील खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्याचे संकेत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काश्मीर पोलिस आणि लष्कराकडून ही समाधानकारक कारवाई करण्यात आली असून दहशतवाद्यांचे प्रमाण आता घटत आहे. या वर्षी मारल्या गेलेल्या 62 अतिरेक्यांपैकी 32 दहशतवादी हे संघटनांमध्ये सामील झाल्यावर अवघ्या तीन महिन्यात मारले गेल्याचं काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं आहे.
यावर्षी मारल्या गेलेल्या दहशवाद्यांपैकी काहीजण मागच्या वर्षी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. पाकिस्तान लहान शस्त्रे, ड्रोनद्वारे तस्करी करुन टार्गेटवर हल्ला करण्यासाठी स्थानिक लोकांचा वापर करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. " सध्या काश्मीरमध्ये असलेले दहशतवादी हे पूर्णवेळ दहशतवादी नसून ते नोकऱ्या, काम करत करत संघटनामध्ये काम करतात आणि परत त्यांना शस्त्रे परत करतात." असं जम्मू आणि काश्मीर पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.