देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यां कंगनाचे पणजोबा गांधीजींच्या हाकेला ओ देत स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला पंगा क्वीन असं म्हटलं जातं. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने कंगना वादात अडकते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, शेतकरी आंदोलन यावेळी तिने ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आताही तिने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यानं सर्वत्र टीकेचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर तिने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यात कंगनाने म्हटलं की, १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक आहे. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं असं तिने म्हटलं होतं.
भाजपचे खासदार वरुण गांधींनीसुद्धा तिच्यावर टीका केली. गांधीजींच्या त्याग आणि तपश्चर्येचा हा अपमान आहे. सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाच्या द्वेषातून कंगाने हे वक्तव्य केलं असून याला वेडेपणा म्हणायचा की देशद्रोह असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. कंगनाने स्वातंत्र्याबद्दल असं वक्तव्य केलं पण तिचे पणजोबा स्वत: स्वातंत्र्य सैनिक होते. गांधीजींच्या एका हाकेला ओ देत त्यांनी ब्रिटिशांची नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता.
कंगनाचे वडिल अमरदीप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना व्यवसायाची कोणती कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. कंगनाचे वडिल अमरदीप यांचे वडिल म्हणजे कंगनाचे आजोबा ब्रह्मचंद रानौत हे प्रशासकीय अधिकारी होते तर तिचे पणजोबा सर्जू सिंग हे स्वातंत्र्य सैनिक आणि राजकारणात सक्रीय होते.
सर्जू सिंग हे हिमाचल प्रदेशात राहत होते. तेव्हा ते ब्रिटिशांकडे ते हेड क्लार्क म्हणून नोकरी करायचे. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यासाठी हाक दिल्यानंतर ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. तेव्हा गांधीजींनी आपल्या पणजोबांना पत्र लिहिल्याचंही कंगनाने याआधी सांगितलं होतं. सर्जू सिंग हे काँग्रेसचे मोठे नेते बनले होते. त्यांनी हिमाचल प्रदेशात स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. सर्जू सिंग यांच्यानंतर कंगणाचे आजोबा हेसुद्धा गांधीवादी होते. मात्र ते कधी राजकारणात उतरले नाहीत. त्याऐवजी त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला होता.
कंगना रानौतचे पणजोबाच स्वातंत्र्य सैनिक असताना तिचे स्वातंत्र्याबद्दलचे असे मत खटकणारे असल्याची टीका आता सोशल मीडियातून होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना म्हटले की, स्वातंत्र्य संग्रामात लढलेल्यांना ताम्रपट देण्यात आला होता. मग देशाने ते ताम्रपट भिकाऱ्यांना दिले का यावर आता भाजपने स्पष्टीकरण द्यावं. कंगनाला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावेत नाहीतर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच हक्क भाजपला नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी सुनावले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.