काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची यादी जाहीर केली
मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथील भाजपचे लोकसभा उमेदवार कुंवर सर्वेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले, अशी पुष्टी मुरादाबाद शहरातील भाजप आमदार रितेश गुप्ता यांनी दिली.
मुरादाबादमध्ये काल लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं.
भारत सरकारकडे ३० लाख पदं रिक्त आहेत. काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही या जागा भरु आणि बेरोजगारी दूर करु. जातीनिहाय जनगणनेवरुनही राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला.
तिहार तुरुंगाचा अहवाल हा भाजपचा कट असल्याचं दिसून येत आहे. रक्तातील साखरेची पातळी 300 असणं धोकादायक आहे. तरीही केजरीवालांना इन्सुलीन का दिलं जात नाही? असा सवाल आप नेत्या आतिशी यांनी केला.
दिल्ली के दरिंदों के आगे तृणमूल काँग्रेस नहीं झुकेंगी, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्र सोडलं.
माजी केंद्रीय मंत्री आणि सासणचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी म्हटलं की, महाआघाडीच्या उमेदवारांकडे मुखवट्याशिवाय काहीही नाही. खरी लढाई ही लालू प्रसाद यादव यांच्याशी आहे. रुडी यांनी लालूंच्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप केला. ते म्हणाले, लालूंकडे उमेदवारच नाहीत. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवलं आहे.
पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली असून मुंबई- बंगळुरू महामार्गावर सुस खिंड येथे पावसापासून बचाव करण्यासाठी वाहनचालकांनी रस्त्यावरच दुचाकी उभ्या केल्या आहेत. त्यामुळे येथील सुस खिंड ते बाणेरमधील सदानंद हॉटेल पर्यंत वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पुणे आणि लातूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील २ तास कायम राहण्याची शक्यता सतर्क या हवामान संस्थेने व्यक्त केली आहे.
पावसाची शक्यता असणारे इतर जिल्हे: अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली
अखेर छत्रपती संभाजनगरमध्ये शिवसेनेचा उमेदवार ठरला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भूमरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.
दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी पाऊस असा प्रकार मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतोय. त्यानुसार आजही पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली आहे. जांभूळवाडी - कोळेवाडी, आंबेगाव बुद्रुक - खुर्द परिसरात पावसाच्या हलक्या सरी झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "पहिल्या टप्प्यातील मतदानाने देशाचा उत्साह वाढवला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान एनडीए आणि विकसित भारताच्या बाजूने झाले आहे. मी देवेगौडाजींप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या ऊर्जेमुळे मलाही प्रेरणा मिळते.''
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करणाऱ्याला अटक केली आहे. दारूच्या नशेत कॉल केल्याचा पोलिसांना संशय. सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हस्तक येणार आल्याची माहिती दिली होती.
सचिन तेंडुलकर यांनी सांगितले की, "युवा फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात काम करते. युवा फाऊंडेशनला आम्ही सपोर्ट करत आहोत. इथे येऊन मला युवा फाऊंडेशनबद्दल बरेच काही कळले. मुलांना खेळताना पाहून मला माझे बालपण आठवले. मी त्यांच्यासोबत वाढदिवसाचा केकही कापला.''
बहुजन ेोविकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बहुजन विकास आघाडी स्वबळावर पालघर लोकसभा लढवणार असे जाहीर केले.
बदलापूर शहरात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार असलेल्या कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सर्व्हेसाठी गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्याने रोखल्याची घटना समोर आली आहे.
वर्षानुवर्षे विक्री न झालेली म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांच्या एकगठ्ठा विक्रीला म्हाडाने मुदतवाढ दिली आहे. चार-पाच वर्षापासून विक्री विना पडून असलेली घरे विकली जावीत म्हणून म्हाडाने १६ मार्चपासून घरांच्या एकगठ्ठा विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याने म्हाडाने सवलतीच्या दरातील एकगठ्ठा विक्री योजनेला २ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पश्चिम रेल्वेवर शून्य भंगार मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पश्चिम रेल्वेने आर्थिक वर्ष २०२३-२४ भंगार विक्रीतून ४६९ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.
ठाकरे गटात नाराज असलेले विजय करंजकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. विजय करंजकर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आहेत.
राहुल गांधी आज बिहार दौऱ्यावर आहेत. भागलपूर येथील सभेमध्ये बोलताना ते म्हणाले, की भाजपला देशात 150 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत.
'बघतोय रिक्षावाला' संघटना पुरस्कृत उभे असलेले अपक्ष उमेदवार, रिक्षाचालक शरद राम पवार यांचा बारामती लोकसभेसाठीचा अर्ज मंजूर झाला आहे. सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे हा अर्ज वैध झाला असून, प्रशासनाकडून मान्य करण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे, तर डमी उमेदवार सचिन दोडके यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आलं आहे. तर व सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर झाला आहे. अजित पवारांनाही उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाकडून अर्जाची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत अजित पवारांचा अर्ज नामंजूर करण्यात आली आहे.
प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये सभा घेत आहेत. यावेळी जमलेल्या मतदारांशी बोलताना मोदींनी मराठीतून सुरूवात केली. सर्वांना रामराम म्हणत मोदींनी भाषणासा सुरूवात केली आहे.
विशाल पाटील यांना काँग्रेस निलंबित करण्याची शक्यता आहे. विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज परत न घेतल्यास काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे. सांगलीत ठाकरे गटाने उमेदवार दिल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
ओडिशाच्या महानंदी नदीमध्ये काल एक बोट उलटली होती. यात एका महिलेचा मृत्यू झालाय, तर सातजण बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आणखी एखाचा मृतदेह सापडला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणालेत की, दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे.
आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरु आहे. कारण काँग्रेस आणि उबाठामध्ये दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते.
माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळविले की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो.
शरद पवारांनी आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, विधानसभेवर आमचं जास्त लक्ष असणार आहे. विधानसभेच्या जास्त जागा लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. गेल्या १० वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. मोदी-शहांनी दहा वर्षात काय केलं ते सांगावं.
युद्धांची स्थिती निर्माण झाल्याने एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. इराण-इस्राइलकडे जाणारी विमान सेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर: पुलवामा येथील टेंघारा गावात मुसळधार पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा प्रवाह घरांपासून दूर वळवण्यासाठी पाण्यासाठी रस्ता तयार केला आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये रामनवमीदरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. 'शक्तीपूर आणि बेलडाणा येथील प्रभारी अधिकारी हिंसाचार आणि दंगली रोखण्यात यशस्वी ठरले नाहीत, त्यामुळे त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.'
झारसुगुडा, ओडिशा : काल संध्याकाळी महानदीमध्ये बोट उलटून एकाचा मृत्यू झाला आहे. तर 7 बेपत्ता आणि 48 जणांची सुटका करण्यात आली आहे. सध्या बचाव आणि शोध मोहिमेचं कार्य सुरु आहे.
मुंबई : रमाशंकर गौतम उर्फ संदीप पांडे या २१ वर्षीय तरुणाला मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या शौचालयात ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
सातारा : महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० एप्रिलला कऱ्हाडला जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनाबाबत सध्या तयारीला वेग आला आहे. कऱ्हाडमधील भाजपच्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत मैदानाची पाहणी केली. सभेच्या नियोजनासाठी आज (शनिवारी) साताऱ्यात कोअर कमिटीची बैठक होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.
नवी दिल्ली : देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी काल शांततेमध्ये मतदान पार पडले. तब्बल ६० टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पश्चिम बंगाल, छत्तीसगड या दोन राज्यांतील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये ही प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारामध्ये २५ पेक्षाही अधिक लोक जखमी झाल्याचे कळते.
Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघांत उन्हाच्या तडाख्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. या सर्वच ठिकाणांवर सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर, देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी शांततेमध्ये मतदान पार पडले. तब्बल ६० टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. आज मुख्यमंत्री शिंदे नाशिकचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींची नांदेडमध्ये आज जाहीर सभा होणार आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.