२३ ऑगस्टच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान कात्रज घाटात भाजपचे झेंडे, टोप्या आणि टी शर्ट मोठ्या प्रमाणात आढळल्याचा दावा स्वच्छता ग्रुपने केला आहे. ‘युवा की आवाज’ वंदे मातरम् कार्यक्रमासाठी उपस्थितांना वाटण्यात आलेले हे साहित्य घाटात टाकण्यात आल्याचे ग्रुपचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांपासून कात्रज घाटात स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या इन्कलाब जयंते ग्रुपने यापूर्वीही अशाच प्रकारचे राजकीय साहित्य हटवल्याचे सांगितले. घाटात सध्या केवळ तीन सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी किमान सात कॅमेरे बसवावेत, तसेच सुरक्षा भिंतीचे कोसळलेले सुमारे चौदा भाग तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप नेतृत्वाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करावी आणि सार्वजनिक ठिकाणी राजकीय साहित्य टाकले जाऊ नये यासाठी कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती कार्यशाळा घ्यावी, असेही ग्रुपने म्हटले आहे. हा राजकारणाचा विषय नसून नागरिकांच्या जबाबदारीचा प्रश्न असल्याची भूमिका घेत ३० ऑगस्टला पुन्हा कात्रज घाटात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रुपने दिली.