'आमच्या वैमानिकाच्या केसालाही धक्का लागता कामा नये'

sushma swaraj
sushma swaraj

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला आमच्या ताब्यात द्यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतर पाकिस्तानने आज (बुधवार) भारताच्या लष्करी ठाण्यांना लक्ष्य करत बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षा यंत्रणा कमालीच्या दक्ष असल्याने हा हल्ला निष्फळ ठरला', असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या कारवाईमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एक विमान पाडले; पण याच कारवाईत आपलेही एक विमान पडले आणि त्यातील वैमानिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. या बैठकीत भारताकडून पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला आहे. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आमच्या ताब्यात देण्यात यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशाराही भारताने दिला आहे. भारतीय वैमानिकाला सोडवण्यासाठी केंद्र सरकारनेही आता दबाव टाकला आहे.

दरम्यान, विमान कोसळल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी स्वतःची सुटका करून घेतली. परंतु, पाकिस्तानच्या नागिरकांनी त्यांना मारहाण सुरू केली. अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यात त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता. व्हिडीओत हात-पाय बांधलेले दिसत होते. डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. पाकिस्तानने अभिनंदन यांचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी सैनिकांनी नागरिकांच्या तावडीतून वाचविल्याचे म्हटले आहे. यामध्ये ते चहा पित असताना पाकिस्तानी सैनिकांशी बोलत असल्याचे दिसत आहेत. पाकिस्तानचे सैनिक अभिनंदन यांना नाव-गाव-पत्ता विचारत आहेत. ज्यावर अभिनंदन यांनी केवळ नाव व मी दक्षिण भारतीय आहे एवढेच सांगितले आहे. 'मला खात्री आहे बाकी तुम्ही शोधून काढालंच...' असे म्हणत 'सॉरी मेजर मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकत नाही' असे म्हटले आहे.

युद्धबंदीसाठी काय आहे नियम?
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियम पाळत असेल तर अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लावता येणार नाही. कारण, युद्धबंदींसाठी खास करार आहे. जिनेव्हा करार असे याचे नाव आहे. या करारानुसार युद्धबंदींना भीती दाखवली जाऊ शकत नाही, किंवा त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धबंदींचा वापर करुन जनतेमध्ये उत्सुकता करण्यासाठीही बंदी आहे. जिनेव्हा करारानुसार, एकतर युद्धबंदीवर खटला चालवला जाऊ शकतो, किंवा संबंधित देशाकडे त्या युद्धबंदीचे हस्तांतरण करावे लागेल. युद्धबंदी पकडल्यानंतर नाव, सैन्यातील पद आणि नंबर सांगण्याची तरतूद आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला अभिनंदन यांना एका सैनिकासारखीच वागणूक द्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com