नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानकडून आपल्या दिशेने झाडण्यात येणाऱ्या एका गोळीला फैरींमधून उत्तर द्या! हे करताना गोळ्यांचा हिशेब ठेवू नका, अशा स्पष्ट सूचना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लष्कराला दिल्या आहेत.
मागील काही दिवसांत पाकच्या कुरापती वाढल्या असून, चालू वर्षांतदेखील या चित्रात फारसा बदल झालेला नाही. उभय देशांत 2003 मध्ये झालेल्या शस्त्रसंधी करारानंतर सीमावर्ती भागांतील चकमकी वाढल्या आहेत.
आगरतळा येथे आयोजित प्रचारसभेमध्ये बोलताना राजनाथसिंह यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, '' भारताला पाकिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत; पण पाकनेच चिथावणी दिली तर आम्ही त्याला सडेतोड उत्तर देऊ. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताना गोळ्यांचा हिशेब ठेवू नका, असे स्पष्ट आदेशच मी लष्कराला दिले आहेत. आम्हाला पाकिस्तानवर प्रथम हल्ला करायचा नाही. शेजारी देशांसोबत आम्हाला शांतता आणि सौहार्द हवाच आहे; पण दुर्दैवाने पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमधील स्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करत असून आमचा प्रदेश, सुरक्षा दलांवरदेखील हल्ले केले जात आहेत.''
पूँचमध्ये पुन्हा गोळीबार
पाकिस्तान लष्कराने आज सलग दुसऱ्या दिवशी पूँच सेक्टरमध्ये गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. लघू आणि स्वयंचलित शस्त्रांमधून गोळीबार करण्याबरोबरच काही तोफगोळेही डागण्यात आले. आज सकाळी अकराच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला होता, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय लष्करानेही याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
शस्त्रसंधी उल्लंघन
वर्ष | घटना |
2015 | 222 |
2016 | 233 |
2017 | 379 |
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.