रेल्वेच्या तिकीट दरवाढीची शक्यता

representational image
representational image

नवी दिल्ली : गुजरातची निवडणूक पार पडताच रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लावण्याच्या हालचाली जोरात सुरू केल्या आहेत. दिवाळी, छटपूजा, दुर्गापूजा, गणेशोत्सव आदी सणासुदीच्या; तसेच सुटीच्या दिवसांत रेल्वेचे दर 10 ते 20 टक्‍क्‍यांनी महागण्याची चिन्हे आहेत. विमानसेवेप्रमाणेच रेल्वेतही डायनॅमिक तिकीट दरयंत्रणा लागू करण्याची तयारी झाली असून, पीयूष गोयल यांच्या रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील देताच ही योजना सुरू केली जाईल. 

साधारणतः 31 डिसेंबरपर्यंत यावर 'पीएमओ'च्या सल्ल्यानुसार मंत्री म्हणून गोयल यांच्याकडून निर्णय अपेक्षित असून, नव्या वर्षात प्रवाशांना रेल्वे दरवाढीचा झटका बसू शकतो. 

सुरेश प्रभू यांच्या काळात फ्लेक्‍सी फेअर ही योजना रेल्वेने आणली व ती फसल्यात जमा आहे. याविरुद्ध प्रवाशांत रोष आहे. त्यामुळे या योजनेचा फेरआढावा घेण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वी गोयल यांनी, विमानसेवेप्रमाणे रेल्वेचे संचालन करण्याचा विचार बोलून दाखविला होता. मात्र रेल्वे बोर्डाच्या बाबूशाहीने त्याचा अर्थ विमानाप्रमाणे रेल्वेचे तिकीटदर सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर वाढवणे हा घेतला असावा, अशी शंका जाणकार व्यक्त करतात. प्रस्तावित डायनॅमिक दरवाढ योजनेबाबत रेल्वेने विविध विभागांकडून सूचना मागविल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार त्यापैकी पश्‍चिम, पूर्व व पश्‍चिम मध्य विभागांनी आपापल्या सूचना दिल्या असून त्यात पर्यटनाच्या मोसमात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी दरवाढ करण्यास पूर्ण अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे सणासुदीच्या व सुट्यांच्या दिवसांत प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्यात येणार आहे. याशिवाय राजधानी, शताब्दीसारख्या वेगवान गाड्यांची व रात्रीचा प्रवास करणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांत सरसकट दरवाढ करण्याचाही प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या गंभीरपणे विचाराधीन आहे. जी गाडी जेवढी फास्ट तेवढा तिचा तिकीटदर जास्त असेल, असे विभागांच्या प्रस्तावांत म्हटले आहे. 

मलमपट्टीचीही तयारी 
प्रस्तावित दरवाढीची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्‍यता असल्याने वरवरची मलमपट्टी करण्याचीही चलाखी रेल्वेतर्फे दाखविण्याची चिन्हे आहेत. ही मलमपट्टी कशी असेल? तर नॉन-पीक अवर्स म्हणजे रात्री 12 ते पहाटे 4 व दुपारी 1 ते 5 या काळातील तिकिटांवर अल्प सूट देण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्यक्षात तांत्रिकदृष्ट्या इतक्‍या सक्षमपणे तिकीट आरक्षण करणारी यंत्रप्रणाली रेल्वेकडे आहे का, असा मूळ प्रश्‍न आहे. सध्या खुद्द संसदेतील व दिल्लीच्या तिन्ही मोठ्या स्थानकांवरही रेल्वे आरक्षण केंद्रावरही दिवसातून अनेकदा 'सर्व्हर डाउन'ची समस्या उद्भवते हा नित्याचा अनुभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com