
मोहन भागवत यांच्या विधानावर AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील गांधी शांती प्रतिष्ठानमध्ये एका पुस्तकाचे प्रकाशन करताना गांधींना सर्वांत मोठा हिंदू देशभक्त म्हटलं होतं. तसेच माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. या महात्मा गांधींच्या वाक्याचा हवाला देत पुढे त्यांनी म्हटलं की, एक गोष्ट स्पष्ट आहे की, जर कुणी हिंदू असेल तर तो देशभक्तच असेल. आणि हा त्याचा मूलभूत स्वभाव आणि चरित्र असेल. त्यांच्या या विधानावर आता AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Will Bhagwat answer: What about Gandhi's killer Godse? What about the men responsible for Nellie massacre, anti-1984 anti-Sikh & 2002 Gujarat pogroms?
It's rational to assume that most INDIANS are patriots regardless of their faith. It's only in RSS's ignorant ideology....[1/2] https://t.co/fZv3GpmlIg
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 1, 2021
ओवैसी यांनी ट्विटरवर काही प्रश्न मांडत मोहन भागवत या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील का? असा सवाल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, मोहन भागवत उत्तर देऊ शकतील का? गांधींचा मारेकरी गोडसेबाबत काय म्हणाल? नेल्ली हत्याकांड, 1984 मधील शीखविरोधी दंगल आणि गुजरात दंगलीसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांबाबत आपलं मत काय? बहुतांश भारतीय हे त्यांच्या श्रद्धा आणि धर्माला गृहीत न धरताही देशभक्त आहेत, हे मानणे अधित तर्कसंगत आहे. ही फक्त RSS ची विचारसरणी आहे की एका धर्माच्या अनुयायांना आपोआपच देशभक्तीचं प्रमाणपत्र दिलं जात आहे. तर दुसऱ्याला भारतात राहण्यासाठी म्हणून स्वतःला भारतीय म्हणवण्याचा आणि इथे राहण्याचा अधिकार आहे, हे देखील सिद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागतं.
हेही वाचा - सर्वांत मोठे 'हिंदू देशभक्त' महात्मा गांधीच; सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य
‘Making of a Hindu Patriot: Background of Gandhiji’s Hind Swaraj’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. हे पुस्तक ‘सेंटर फॉर पॉलसी स्टडीज’ या सामाजिक संशोधन केंद्रातर्फे जे के बजाज आणि एम डी श्रीनिवास यांनी लिहलं आहे. या पुस्तकात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उल्लेख 'हिंदू देशभक्त' असा केला गेलाय.
पुढे भागवत म्हणाले होते की, पाश्चात्य संस्कृतीने आपल्याला धर्मभ्रष्ट केले आहे पण, त्याचा दोष ब्रिटिशांना देऊन काय उपयोग? तुम्ही हिंदू होतात तरीही देश गुलाम बनला, कंगाल झाला. यासाठीच स्वत:तील दोष काढून टाकून स्वत:ला घडवले पाहिजे. गांधीजींना ‘स्वराज्या’च्या संकल्पनेत केवळ ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य नको होते, मूल्यांची पुनस्र्थापना अपेक्षित होती. परंपरागत ज्ञान भारताकडे आहे. गांधीजी ब्रिटीशांना तुम्ही इथून जा, आम्ही पुन्हा उभे राहू असं म्हणत असत. स्वातंत्र्यसंग्राम हा दोन संस्कृतींमधील संघर्षही होता.