नवी दिल्ली : दुसर्या टप्प्यातील ८९ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आज संपल्यानंतर याकाळात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले तर भाजपने धार्मिक ध्रुवीकरणावर प्रचारात भर दिल्याचे स्पष्ट झाले.
पहिल्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर दोन्ही बाजूंनी अधिक आक्रमकपणे प्रचाराला गती आली. दुसर्या टप्प्यात प्रचाराची पातळी खालावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका प्रचार सभेत मंगळसूत्राचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसवर तोफ डागण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या या भाषणाची इतर नेत्यांनी री ओढली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला. यातून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.
या भाषणाला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. हा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव या सर्वांनी पंतप्रधानांच्या भाषणावर तीव्र आक्षेप घेतला. लोकांची संपत्ती मुस्लिम समाजाला देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जाणार असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.
या मुद्यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. राजस्थानच्या भाषणानंतर काँग्रेसने थेट केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेत कारवाईची मागणी केली परंतु तीन दिवसांनंतरही निवडणूक आयोगाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पहिल्या टप्प्यात भाजपला नुकसान सहन करावे लागत असल्याने जनतेचे लक्ष भावनिक मुद्यांकडे वळविण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे केला जात आहे. भाजपतर्फे काँग्रेस पक्ष देशासाठी कसा घातक आहे, याची मांडणी करीत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.