नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना केंद्रीय मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी माफीची मागणी करण्यात येत असून, राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील हा विषय उचलून धरला आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
राज्यात आज सकाळपासून नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. त्यावर भाजपकडून दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाष्य करण्यात आले. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही पत्रकार परिषद घेतली. त्यात रविशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानं महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले आहेत. राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विट करून रविशंकर प्रसाद यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, संभाजीराजे छत्रपती हे भाजपनेच शिफारस केलेले राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार आहेत. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय घडलं होतं पत्रकार परिषदेत?
रविशंकर प्रसाद यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत, विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तसेच शिवसेनेवर टीका करताना, 'त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकारी नाही.' अशा अशयाचे वक्तव्य करताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. त्याचे पडसाद आता सोशल मीडियावर दिसू लागले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.