नवी दिल्ली - हरयानामधील "डेरा सच्चा सौदा'चे बाबा गुरमीत राम रहिम सिंग बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्यानंतर हरयाना व पंजाब भागात हिंसाचाराच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. पंतप्रधान हे आज (रविवार) मन की बात या त्यांच्या कार्यक्रमामध्ये देशास संबोधित करत होते.
"कायदा हातात घेऊन माजविला जाणारा हिंसाचार कदापि सहन केला जाणार नाही. धर्म, राजकारण वा अन्य कोणत्याही मुद्यावरुन हिंसाचार घडविल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. या देशात प्रत्येकाला कायदा पाळावाच लागेल,'' असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.
सिंग यांना बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या परिसरात धुडगूस घातला. या हिंसक जमावाने वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स जाळल्या. तसेच इतर गाड्यांचीही तोडफोड केली. पोलिस आणि डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत किमान 31 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांकडून देण्यात आलेला इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.
|