नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा उद्या (ता.३) पासून राजधानी दिल्लीतून सुरू होतो आहे. राहुल यांनी पहिल्या टप्प्यामध्ये नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची यात्रा पूर्ण केली असून येत्या ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये ध्वजवंदन करून या यात्रेचा समारोप होईल.
काँग्रेसचे संघटनसचिव के.सी. वेणुगोपाल, संवाद विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ‘भारत जोडो’ यात्रेने कन्याकुमारीतील गांधी मंडपम ते दिल्लीतील लाल किल्ला असा ३ हजार १२२ किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे. मागील १०८ दिवसांमध्ये अनेक राज्ये पादाक्रांत केली आहेत.
तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाना आणि दिल्ली राज्यांतून ही यात्रा आता दिल्लीत पोचली. उद्यापासून ही यात्रा सुरू होईल. हरियाना, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतून ही यात्रा काश्मीरच्या दिशेने जाईल.
२० जानेवारीच्या सायंकाळी ही यात्रा काश्मीरमध्ये प्रवेश करेल. ३० जानेवारी रोजी राहुल गांधी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर यात्रेचा समारोप होईल. राहुल यांच्या आगामी दौऱ्यादरम्यानच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करण्यात आली होती.
टिकैत यांचा सहभाग नाही
मेरठ; भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आपण भारत जोडोमध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतात पण मी स्वतः त्यामध्ये सहभागी होणार नाही, असे टिकैत यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.