नवी दिल्ली : 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विलीनीकरणाचा विषय आलाच नाही. या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे 55 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षात विलीन होणार, शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष होणार अशा बातम्या येऊ लागल्या.
या संदर्भात शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या विषयावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. श्री. शरद पवार म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आमच्या दोघांत चर्चा झाली. राजकारणात चढ-उतार होत असतात, त्यामुळे नाउमेद व्हायचे नसते असे मी त्यांना सांगितले. राजीव गांधी यांना जनतेने खूप मोठे पाठबळ दिले होते. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली 400 पेक्षा जास्त काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. पण 1989 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे राजकारणात हार-जीत होतच असते, असे मी त्यांना समजावले.''
पवार पुढे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीनंतर आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका समोर आहेत. महाराष्ट्र, हरियाना, झारखंड आणि दिल्ली या चार राज्यातील निवडणुकांबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली.''
राहुल गांधी हे शरद पवार यांची भेट झाल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहेत. शरद पवार सायंकाळी मुंबईला येणार आहेत, असे समजते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.